


उमरेड (प्रतिनिधी )- उमरेड विधानसभा क्षेत्रातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या उमरेड विधानसभा क्षेत्र इंजि. सपना मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार वाडे यांना निवेदन देण्यात आले.
उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर आणि कुही तालुक्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन व अन्य पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आर्थिक मदत देण्यात यावी. तसेच प्रधान मंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. सोयाबीन पिकाला हेक्टरी दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा व कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.
शेतकऱ्यांना जीवन जगणे कठीण झाल्यामुळे त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही,अशा घटना घडल्यास संपूर्ण शासन प्रशासन जिम्मेदार राहील. शेतकऱ्यांच्या शेतात जाण्या येण्यासाठी फार त्रास होतो म्हणून तात्काळ पांदण रस्त्यांचे कामे मार्गी लावण्यात याव्यात असे सांगण्यात आले.
नायब तहसीलदार मनोज वाडे यांना निवेदन देताना इंजि. सपना मेश्राम, राजुभाऊ मेश्राम, सुजित गेडाम, सुरेश गेडाम, आदिनाथ नानवटकर, संजय मेश्राम, पारस शंभरकर, रजत लिंगायत, अभिजित नानवटकर, योगेश सवाईमुल, त्रिवेन रामटेके, हिमांशू बहादुरे उपस्थित होते.














