


✒️राजुरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
राजुरा(दि.25फेब्रुवारी):- वन विभागात भरारी पथक आणि संरक्षण, अतिक्रमण निर्मूलन पथक असूनही त्याच्या निष्क्रियतेमुळे वने व वन्यजीव संरक्षण धोक्यात आले आहे. हा विभाग बंद करून सक्षम वनकर्मचारी असणारे एकच शीघ्र कृती दल निर्माण करण्याची मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी केली आहे.
वने वन्यजीव संरक्षण, अवैध वृक्षतोड, वनतस्करी, वनक्षेत्रात होणारे अतिक्रमण यावर आळा घालण्यासाठी वन विभागात भरारी पथक, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन असे दोन पथक कार्यरत आहेत. यासाठी वाहन व्यवस्थेसह प्रत्येकी पथकात स्वतंत्र वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, वनमजुर, आवश्यक साहित्य असा लवाजमा आहे. या पथकाचे कर्मचारी यांचे दरमहा लाखो रुपये वेतनातून खर्च होत आहे. असे असतानाही मागील किमान सात वर्षात अशी कोणतीही भरीव कामगिरी या पथकाने केलेली नाही.
आजही कित्येक वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड, रेती व मुरूम तस्करी, आणि विशेष म्हणजे वन्यजीव शिकारी मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. नुकतेच राजुरा येथुन आंतरराष्ट्रीय वाघ शिकारी करणाऱ्या टोळी पकडण्यात आले. कोष्टयाला, चिखली, गणेरी येथील वृक्षतोड प्रकरण ताजे असताना या पथकाची कारवाई प्रगती दिसून आली नाही. केवळ बिट निरीक्षण केल्याचे कागदी अहवाल तयार करून वरिष्ठ अधिकारी तथा वन विभागाची दिशाभूल करून कामचलावूपणा सुरु आहे. वरिष्ठ वन अधिकारी यांचेही या पथकाच्या कार्यप्रणालीवर सपशेल दुर्लक्ष होत आहे. मध्य चांदा वन विभागात तर केवळ आठ वन परिक्षेत्र आहेत. या सर्व वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मौल्यवान सागवान जंगल आहे. वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आहे.
त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष नेहमीचे होत आहे. परंतु हे पथक अशा घटनात कुठेही पुढाकार घेताना दिसत नाही. नियमित वनपाल, वनरक्षक यांना प्रादेशिक नियमित कामामुळे ते व्यस्त असल्यामुळे संरक्षण पथक, भरारी पथक हे खास वन संरक्षण साठी दिलेले आहे. परंतु अश्या निष्क्रिय हे दोन्ही पथक बंद करून एकच प्रशिक्षित सक्षम वन कर्मचारी सशस्त्र पथक तयार करण्यात यावे, ज्यामुळे त्याचे वने व वन्यजीव संरक्षण कार्य प्रभावीपणे होऊ शकेल तसेच वन तस्करी, वन्यप्राणी शिकारी, अतिक्रमण, वृक्षतोडीवर आळा घालण्यात यश मिळेल अशी मागणी बादल बेले यांनी केली आहे.















