


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.14जानेवारी):-आद्यग्रामगीताचार्य श्री रामकृष्णदादा बेलूरकर विचार प्रतिष्ठान नागपूर च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक कार्य सेवागौरव पुरस्कार यावर्षी चंद्रपूर येथील ज्येष्ठ लेखक , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांना वायगाव (नि) येथे प्रदान करण्यात आला. वायगाव येथे नुकतेच आदर्श ग्राम निर्माण संमेलन यशवंत महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित केले होते.
त्यावेळी उपायुक्त (विकास) डॉ. कमलकिशोर फुटाणे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाळ पदवाड, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, रोजगार संघाचे संजय नाथे, आदर्श सरपंच सुधीर गोतमारे, सुधाकर मानकर,अ.भा. श्रीगुरूदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी दामोदर पाटील, उध्दव साबळे, माणिक बेलूरकर, श्रीकांत धोटे , प्रशांत कडू, प्रा.प्रकाश आलवडकर , सुरेंद्र बेलूरकर उपस्थित होते.
ग्रामगीताचार्य बोढेकर हे गेल्या २५ वर्षांपासून साहित्य क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांनी आजवर विविध विषयांवर एकूण १३ पुस्तकांचे लेखन केले असून व्यवसाय शिक्षण, व्यसनमुक्ती , व्यक्तिमत्व विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन, झाडीबोली साहित्य, राष्ट्रसंत साहित्य विषयांच्या अनुषंगाने युवकांचे प्रबोधन केले आहे.














