Home महाराष्ट्र वातकुक्कट डोकी म्हणजे संघटना नव्हे!

वातकुक्कट डोकी म्हणजे संघटना नव्हे!

177

कोणत्याही माणसाचे महत्व ‘पद’ मिळाल्यामुळे कधीच वाढत नाही. तो किती कार्यक्षम आहे,त्याचे कर्तृत्व काय आहे. तो कसे नेतृत्व करुन दाखवतो. यावरच त्याचे खरे व्यक्तीमत्व समाजाला समजते.कर्तृत्वच नसेल आणि ‘पद’ मिळाल्यामुळे अहंपणा,स्वार्थपणा,लबाडी व गर्व चढला असेल.तर कालांतराने निश्चितच त्याचा गर्व खाली होतो.’पदामुळे’ तात्पुरते महत्व वाढते.पण चांगल्या कर्तृत्वामुळे आयुष्यभर त्याचे महत्व टिकुन राहते.’पदामुळे’ आपल्यावर असलेली जबाबदारी व्यवस्थित वेळ देऊन पद घेणाऱ्या व्यक्तीने पार पाडली पाहिजे.चांगली माणसं बरोबर घेऊन त्या क्षेत्रात यश मिळवले पाहिजे.ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला आहे.त्यांची जाणीव कायमच ठेवली पाहिजे.’पद’ कधी तरी जाणारच असते. पण पद गेल्यावरही आपली किंमत कायम राहिली पाहिजे.असे माणसांशी वागले पाहिजे.

नाहीतर हाच समाज तुमची कार्यक्षमता, कर्तृत्व, वागणं, प्रामाणिकता व बोलणं पाहत असतो, ऐकत असतो आणि सहनही करत असताे. मात्र लबाडीसह स्वार्थीपणा वाढला तर योग्य वेळ आल्यावर असा धडा शिकवतो. कि तिथं तुमची किंमत रसातळाला जाऊन शून्य होते. म्हणूनच आपल्या माणसांशी, समाजाशी व विश्वासू मित्रांशी, नीट वागा.नीट बोला व आपले कर्तृत्व निस्वार्थी व चांगले आहे हे काम करून सिध्द करा.तरच लोक तुमच्या सोबत राहतील.हे बोलणारी आणि आचरणाने करून दाखविणारी व्यक्ती मी सागर रामभाऊ तायडे यांच्या रुपात पाहिली. ते मान्यताप्राप्त कामगार नेते,पत्रकार, साहित्यिक आहेत. पण आमच्या सोबत असतांना ते कोणी मोठे पदाधिकारी आहेत असे कधीच वागत नाही.

रस्ता चुकणे चुकीचे नसते.मात्र रस्ता चुकत आहे.हे समजून परत त्याच रस्त्याने चालत राहणे.नक्कीच चुकीचे असते.दिवंगत प्रतापसिंग दादा बोदडे यांना काव्यातून श्रध्दांजली!! २६ जून 22 ला सह्याद्री हॉल भांडुप मध्ये या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केले तेव्हा त्यांची माझी ओळख झाली होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते नेते यांच्याशी प्राथमिक चर्चा केली.तेव्हा मला समजलेले की या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सागर भाऊ तायडे आहेत. ज्यांनी आयुष्यभर बुध्द, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार प्रबोधनाचे काम आपल्या लेखनीच्या माध्यमातून केले. समाजाला एकत्र आणण्याचा काम केले. हेच उद्धिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दिवंगत प्रतापसिंग दादा बोदडे यांच्या स्मरणार्थ आपण काही तरी केलं पाहिजे. हिच विचार डोक्यात घेऊन त्यांनी भांडुप मधील कलावंतांच्या छत्रपती शिवाजी महाराज तलाव गार्डनमध्ये मिटिंग घेतल्या. अशोक वंजारी यांनी प्रथम कवि गायक अमर नवघरे यांची ओळख करून दिली. आणि नवघरे यांनी सर्व कवि गायक,शाहीर यांना एकत्र केले त्यांच्या समोर सागर भाऊ नी दिवंगत प्रतापसिंग बोदडे यांना काव्यातून अभिवादन सभा घेण्याची संकल्पना मांडली व ती सर्वांना आवडली.

सर्व कलावंतांना ती संकल्पना मान्य झाल्या नंतर अभिवादन सभा घेण्याचा निर्णय झाला. प्रमुख कलावंतांचे मार्गदर्शन घेतले. आणि या कार्यक्रमाची आखणी केली.विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये कुठलाही राजकीय पक्षांचा किंवा कुठल्याही संस्थेच्या काहीही संबंध राहणार नाही.हा सामाजिक कार्यक्रम आहे. सामाजिक बांधिलकी ठेऊन धम्माचा कार्यक्रम आहे.हे त्यांचे सुरूवात पासून वाक्यं आहे. त्यासाठी त्यांनी विशेष लेख लिहून वैचारिक भूमिका मांडली. परंतू काही लोक या कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण करण्याच्या प्रयत्न करत होते.की आमचं नाव घेतले नाही, आमच्या पक्षाचे, संस्थेचे नांव टाकले नाही. आमच्या संस्थेचे नाव टाकायला पाहिजे होते.आम्ही धम्म दान देणार नाही.असे बोलतात आणि जे धडपड करतात त्यांना ही भडकवण्याचा प्रयत्न करतात. सागर तायडे यांनी सर्व कलावंतांना विनंती केली. की कोणालाच जास्त फोर्स करु नका. जो येईल त्यांचं आपण स्वागत करू, होईल तेवढं माणसं जोडण्याचं काम करा आणि धम्मदान गोळा करा.

अनुकूल दिवसांत दिसणारी गर्दी म्हणजे संघटना नाही.तर प्रतिकूल दिवसात साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.हवे बरोबर तोंड फीरवणारी शेकडो वातकुक्कट डोकी म्हणजे संघटना नव्हे तर वादळात ही ठाम पणे पाय रोखून आपल्या ध्येयाशी उदिष्टाशी इमान राखणारे मर्यादीत शिलेदार म्हणजे संघटना. हे मी अनेक ठिकाणी वाचले होते.सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान राग, लोभ आरोप प्रत्यारोप होणारचं. वैचारिक मतभेद तर अपरिहार्य असतात. मतभेद मनभेद होऊन ही अनेक अडचणीला तोंड देऊन जे काही टिकून राहतात. त्यांच्या एकत्र राहण्यालाचं संघटना म्हणतात. आणि संघटना वाढवण्यासाठी चार जण महत्त्वाचे असतात. १) ज्यांच्या कडे बुध्दी आहे. त्यांनी माणसं जोडावी. २) ज्यांच्याकडे वेळ आहे. त्यांनी संघटना वाढवण्यासाठी वेळ द्यावा.३) ज्यांच्याकडे कष्ट आहे त्यांनी संघटना वाढवण्यासाठी कष्ट द्यावेत. आणि ज्यांच्याकडे काहीचं नाही त्यांनी संघटनेत किमान गप्प तरी बसावे. अडचण पहिल्या तिघांची नसते पण ज्यांच्याकडे काहीचं नाही त्याची वळवळ जास्त असते.हे वळवळ करणारे माणसं चळवळ मोडीत काढत असतात.

सागर तायडे आणि आमच्या कलावणतांची भेट झाली तेव्हा पासुन आम्ही पहिल्या पेक्षा जास्त किर्याशील झालो. जुन्या मान्यताप्राप्त संस्थेतुन बाहेर पडून नवीन समता साहित्य लोककला केंद्र ही संस्था स्थापन केली. सागर तायडे यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन मंच च्या माध्यमातून कालकथीत प्रतापसिंग बोदडे अभिवादन सभे नंतर, कवी गायकांचे संमेलन घेतले, कालकथीत सम्राटकार बबन कांबळे, व कालकथीत गोविंद इंगळे यांची श्रद्धांजली सभा घेतली, कालकथीत रमेश काळू इंगळे गुरुजी आदरांजली सभा घेतली. रमाबाई हत्याकांडात शहीद भिमसैनिकांना गीतातून शहिदांना अभिवादन करणाऱ्या सभेचे आयोजन केले. प्रत्येक वेळी सागर तायडे यांनी तरुण तडपदार तरुणांना जबाबदारी देऊन संधी दिली. कार्यक्रमाला धम्मदान गोळा करणे त्यांचा जमा खर्च ठेवणे, सूत्रसंचालन करणे समनव्यातुन माणसं जोडणे बोलण्याची संधी उपलब्ध करून देणे. त्यातूनच मैत्रिभावना वाढविण्यासाठी सागर तायडे यांनी विशेष भर दिला. या एक वर्षात मी त्यांच्या बरोबर राहून खूप अनुभव घेतला. हँडबील पोस्टर, बॅनर वर नांवाची अपेक्षा ठेवणारे खूप पाहिले, स्टेजवर बसायला जागा मिळाली पाहिजे आणि बोलण्यासाठी संधी मिळाली पाहिजे असे काही न करता अपेक्षा ठेवणारे मी डोळ्याने पाहिले. त्यांना सोबत घेऊन कार्यक्रम यशस्वी करणे अवघड असतांना सागर तायडे यांनी भांडूप विभागात लक्षवेधी आणि प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन दाखविले.त्यात जेष्ठ कवी साहित्यिक लक्ष्मण देठे गुरुजीचे वयाच्या ७६ वर्षी सोबत फिरून साथ देणे तरुणंना लाजवेल असे आहे.

तरुणांना घडविण्याचे काम सागर तायडे लक्ष्मण देठे हे माझे दोन गुरुजी करीत आहेत. त्यामुळेच आम्ही रुपेश साखरे, श्रीकांत गायकवाड अमोल गमरे, सुनिल आखाडे,राहुल गायकवाड, राहुल इंगळे सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेऊन यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत.ते आमचे काम, कार्य वातकुक्कट डोकी असणाऱ्यांना सहन होत नाही. हे पहिल्या दिवसापासून अनुभवतो. त्यावर मी खूप वेळा लिहण्याचा प्रयत्न केला. पण लोक काय म्हणतील यामुळे ते लिहणे सोडून देत होतो. पण ११ जुलै २०२३ ला रमाबाई हत्याकांडातील शहीद भीमसैनिकांना गीत गायनातून अभिवादन सभा घेण्याची सागर तायडे यांची जिद्द पाहून लिहण्याचे धाडस करीत आहे. १० जुलै च्या रात्री २ वाजेपर्यंत कार्यक्रमासाठी लागणारा निधी उपलब्द झाला नाही.म्हणून काय करायचे आम्ही वाट्सापवर मेसेज करून एकमेकांना विचारत होतो. तेव्हा सागर तायडे म्हणत होते, काळजी करू नका आपण सर्व आहोत ना.बंदोबस्त होईल. ११ जुलै ला सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत सागर तायडे व लक्ष्मण देठे गुरुजी हक्काच्या सेवा निवृत्त मित्राकडे गेले त्यांच्याकडून धम्म दान मिळविले.अनेकांना संपर्क केला.

त्यांनी परस्पर जी पे वर पैसे जमा केले. राहुल इंगळे ताबडतोब ग्रुपवर माहिती देत होते. कार्यक्रम सुरु होण्याच्या वेळी अंदाजे खर्चाची रक्कम जमा झाली आम्ही तणावात होतो.पण सागर तायडे ताणवत दिसत नव्हते. सर्वांना सोबत घेऊन कार्यक्रम घेतला तर सर्वांची जबाबदारी असते. पण मी पहिले अनेक लोक या जबाबदारी पासून दूर जात होते. याच नव्हे तर प्रत्येक कार्यक्रमाला महिला धम्म उपासिकांनी खूप मोलाची उपस्थिती आणि धम्मदान दिले. त्यात सुनिता तायडे, विजया वानखडे,तुळसाबाई इंगळे, चंद्रकला तायडे, कोकिला बांगर, ज्योती ताई थाटे, कौशल्याबाई मुरेकर, सीमाताई इंगळे आम्रपाली सुरडकर या नेहमीच सागर तायडे याच्या सामाजिक, धार्मिक कार्यात सहभागी असतात. हे पाहून मला संघ आणि संघटना यांचे महत्व पटले. म्हणूनच वातकुक्कट डोकी म्हणजे संघटना नव्हे.हे मी लिहले लिहण्याची सवय नाही काही चुकले असेल तर माफी असावी, चूकभूल घ्यावी द्यावी.

✒️गौतम मोरे(भांडूप मुंबई)मो:-९६०४७०२६५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here