


नागभीड:-संजय बागडे ९६८९८६५९५४
नागभीड – प्रसिद्ध स्कॉटिश विचारवंत एच. ड्रमॉन्ड यांनी म्हटल्याप्रमाणे, जो तर्क करत नाही तो धर्मांध होय. जो तर्क करू शकत नाही तो मूर्ख होय. जो तर्क करण्याचा साहस करत नाही तो गुलाम होय.
आजची परिस्थिती बघता हे वरील विचारवंताचे विचार संपूर्ण भारतातील बहुजन समाजाला तंतोतंत लागू पडतात. कोणत्याही घटनेची सत्यता ओळखण्याचे सामर्थ, ती घटना सत्य की सत्य यावरती तर्क करण्याच साहस आजच्या बहुजन समाजामध्ये अजिबात दिसत नाही.
याचं कारण म्हणजे या देशातील बहुजन समाजाला वर्षानुवर्ष तर्क करण्यासाठी ज्या ज्ञानाची, शिक्षणाची आवश्यकता होती ते या समाजाला मिळू दिले नाही. त्यामुळे आजही बहुजन समाज जी घटना समोर दिसते ती कोणतेही तर्क न करता जशीच्या तशी स्वीकारते. म्हणून आज हा संपूर्ण बहुजन समाज गुलामीत जीवन जगताना दिसतो आहे. माणसाला प्रज्ञा म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला ज्ञानाबरोबरच शिलाची सुद्धा आवश्यकता आहे. शील म्हणजे माणसाची नैतिकता किंवा त्याचा चारित्र त्यानंतर प्रज्ञा आणि शील असून नुसतं चालत नाही तर या दोन्ही तत्त्वासोबत करुणा या तत्त्वाची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे आणि केवळ माणसाजवळ प्रज्ञा, शील, करुणा या तीनच गोष्टी असून चालत नाही तर त्या बरोबर बुद्धांनी सांगितलं सर्वोच्च तत्व म्हणजे मैत्री. मैत्री शिवाय प्रज्ञा,शील, करुणा ही तीनही तत्वे पाहिजे तेवढे प्रभावी ठरत नाही. जर आपल्याला धम्म हा सद्धम्म बनवायचा असेल तर प्रज्ञा शील करुणा यांच्यासोबत मैत्रीचे स्थान सर्वोच्च असणे आवश्यक आहे. असा हा जगातील सर्वश्रेष्ठ सद्धम्म बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर दिला आणि आम्हाला हा सद्धम्म देताना बाबासाहेबांनी सांगितलं की या बुद्धाच्या सद्धम्माची तत्त्वे संपूर्ण बहुजनाच्या कल्याणासाठी आहेत आणि या तत्त्वाचे पालन आपण केले पाहिजे अन्यथा सद्धम्म हा सद्धम्म न राहता अधम्म होऊन जाईल आणि हे कार्य संपूर्ण जगभर पसरवण्याकरता आंबेडकरवादी विचारवंतांनी पुढे येऊन समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करावा.
असे मत प्राध्यापक शिंगाडे यांनी स्थानिक जनकापूर, तालुका नागभीड येथे बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
स्थानिक जनकापूर येथे बौद्ध विहाराच्या प्रांगणात बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन रमाई महिला मंडळ, बौद्ध महासभा तसेच बौद्ध समाज जनकापुर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध तसेच महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन तसेच पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष काटकर सर, प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक अशोक शिंगाडे, डॉ. टेंभूरकर, प्रा. जयंत रामटेके हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लहुजी रामटेके तंटामुक्ती अध्यक्ष, महेश रामटेके उपसरपंच, दामोदर खोब्रागडे बौद्ध महासभा अध्यक्ष, डॉ. घोटेकर, शारदा सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य जनकापुर हे विचारमंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक अरविंद चंदनखेडे यांनी केले. संचालन राहुल रामटेके यांनी केले तर आभार ब्रम्हदास शेंडे यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता संपूर्ण जनकापुरवासीय प्रबुद्ध नागरिकांनी सहकार्य केले.













