


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.3जून):- गडचिरोली जिल्ह्याला ‘स्टील हब’ बनविण्याच्या नावाखाली महायुती-भाजप सरकार जिल्ह्याचे नुकसान करीत असल्याचा आरोप करत, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी करीता भेंडाळा परिसरातील १४ गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी 13 गावांच्या जमीन अधिग्रहणासंदर्भात शासनाने आदेश दिले आहे.
या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही.
तसेच, गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाही, त्यांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा.
या सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी ४ जून २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले असून या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.















