


5 जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व जनमानसात रुजविणे, निसर्गाविषयी संवेदनशीलता निर्माण करणे आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याचा संदेश देणे हा या दिवसामागील मुख्य उद्देश आहे. मात्र दुर्दैवाने, आज पर्यावरण दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम, सोशल मीडियावरील पोस्ट, झाडे लावण्याचे फोटोसेशन आणि भाषणापुरता मर्यादित राहिलेला दिसतो. प्रत्यक्षात मात्र विकासाच्या नावाखाली जंगलांची कत्तल, नद्यांचे प्रदूषण, डोंगरांची तोड, हवेत वाढणारे विषारी घटक आणि शहरांच्या काँक्रीटीकरणामुळे पृथ्वीचा श्वासच गुदमरू लागला आहे. आज जग एका अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, पाण्याची टंचाई, वाढते तापमान, असंतुलित पाऊस, चक्रीवादळे, महापुर, दुष्काळ आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही केवळ वैज्ञानिक अहवालातील शब्दावली राहिलेली नाही, तर ती आता मानवी जीवनाला थेट ग्रासणारी वस्तुस्थिती बनली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात तर परिस्थिती अधिक गंभीर आहे. कारण येथे लोकसंख्या वाढ, अनियंत्रित शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि भ्रष्ट व्यवस्थेमुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात आला आहे.
आज शहरांमध्ये रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो झाडे एका रात्रीत कापली जातात. प्रशासन म्हणते, “विकासासाठी आवश्यक आहे.” पण हा विकास नेमका कुणासाठी आणि कोणाच्या किंमतीवर? झाडे तोडून, नद्या बुजवून आणि डोंगर फोडून उभे राहणारे सिमेंटचे जंगल खरंच प्रगतीचे प्रतीक म्हणता येईल काय? विकासाचा अर्थ जर फक्त मॉल, उड्डाणपूल, टॉवर्स आणि कारखाने एवढाच उरला असेल, तर आपण भविष्यातील पिढ्यांसाठी मृत्यूचा वारसा तयार करत आहोत, हे स्पष्ट आहे. भारतातील अनेक शहरांची हवा आज धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये वाढते वाहनप्रदूषण, औद्योगिक धूर आणि धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. श्वसनाचे आजार, हृदयविकार, त्वचारोग आणि कर्करोगासारख्या रोगांमध्ये वाढ होत आहे. दुसरीकडे प्लास्टिक प्रदूषणाने नद्या, समुद्र आणि जमीन अक्षरशः गुदमरली आहे. प्लास्टिक बंदीचे कायदे फक्त कागदावर दिसतात, प्रत्यक्षात बाजारपेठेत सर्वत्र प्लास्टिकचा सुळसुळाट सुरूच आहे.
पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत शासनाची भूमिका अनेकदा दुटप्पी दिसते. एका बाजूला वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात, तर दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रकल्पांसाठी हजारो हेक्टर जंगल जमीन उद्योगपतींना दिली जाते. जंगल हे केवळ लाकूड किंवा जमीन नसून ते पृथ्वीचे फुफ्फुस आहेत, हे शासनाला समजत नाही का? पर्यावरणीय मंजुरी देताना अनेक नियम पायदळी तुडविले जातात. लोकांचा विरोध डावलून प्रकल्प रेटले जातात. पर्यावरण संरक्षणाच्या कायद्यांमध्येही अनेकदा उद्योगस्नेही बदल केले जातात. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, शासन खरोखर पर्यावरण वाचवू इच्छिते की केवळ विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीची विक्री करत आहे? आज नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, पंचगंगा, नाग नदी अशा अनेक नद्या औद्योगिक रसायने, सांडपाणी आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत. नदी स्वच्छतेच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खर्च होतात; पण प्रत्यक्षात नद्यांचे प्रदूषण कमी होताना दिसत नाही. कारण भ्रष्टाचार, नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता हेच या समस्येचे मूळ आहे.
पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ झाडांचा किंवा नद्यांचा प्रश्न नाही; तो मानवी अस्तित्वाचा प्रश्न आहे. शेतकरी आज हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका सहन करत आहे. कधी अतिवृष्टी, कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ तर कधी गारपीट यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अन्नधान्य उत्पादनातील घट आणि वाढती आर्थिक अस्थिरता यामागे पर्यावरणीय असंतुलन हे एक महत्त्वाचे कारण आहे. पण दुर्दैवाने, पर्यावरणीय प्रश्नांना अजूनही दुय्यम महत्त्व दिले जाते. आजची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे पर्यावरण संवर्धनाला ‘इव्हेंट’ बनवले गेले आहे. जागतिक पर्यावरण दिन आला की सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्ष आणि विविध संस्था झाडे लावण्याचे कार्यक्रम घेतात. फोटो काढले जातात, सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी ती रोपे वाळून जातात. पर्यावरण संवर्धन ही सातत्याने चालणारी जीवनशैली असायला हवी, ती केवळ एका दिवसापुरती मर्यादित राहून चालणार नाही.
पर्यावरण वाचविण्यासाठी केवळ शासनावर टीका करून उपयोग नाही, प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारीही ओळखली पाहिजे. पाणी वाचविणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, झाडांचे संरक्षण करणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. कारण पृथ्वी ही केवळ आपली मालमत्ता नाही; ती पुढील पिढ्यांचीही आहे. शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण अधिक प्रभावी करणे आवश्यक आहे. मुलांना केवळ पुस्तकातील धडे शिकवून उपयोग नाही; तर त्यांना प्रत्यक्ष निसर्गाशी जोडणे गरजेचे आहे. वृक्षसंवर्धन, जलसंधारण, जैवविविधता आणि कचरा व्यवस्थापन याबाबत सामाजिक जाणीव निर्माण करावी लागेल. पर्यावरण संरक्षण हे केवळ सरकारी विभागाचे काम नसून समाजाच्या प्रत्येक घटकाने त्यात सहभाग घेतला पाहिजे.
माध्यमांची भूमिकाही येथे अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकदा मोठ्या उद्योगसमूहांच्या जाहिरातींच्या दबावामुळे पर्यावरणीय प्रश्नांना पुरेसे स्थान दिले जात नाही. वृक्षतोड, नदीप्रदूषण, खाणकामातील भ्रष्टाचार आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन यावर सातत्याने आवाज उठविणे गरजेचे आहे. कारण स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारिताच समाजाला जागृत ठेवू शकते. आज गरज आहे ती पर्यावरणपूरक विकास मॉडेलची. विकास आणि पर्यावरण हे एकमेकांचे शत्रू नाहीत; पण विकासाचा मार्ग निसर्गाशी सुसंवादी असायला हवा. अक्षय ऊर्जा, जलसंधारण, शाश्वत शेती, हरित तंत्रज्ञान आणि सार्वजनिक वाहतूक यांना प्राधान्य दिल्यास विकास आणि पर्यावरण यामध्ये संतुलन साधता येऊ शकते. पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, पारदर्शक प्रशासन आणि जागरूक नागरिकत्व आवश्यक आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे “आपण पुढील पिढ्यांना नेमकी कोणती पृथ्वी देणार आहोत?” हिरवीगार, स्वच्छ आणि जीवनदायी पृथ्वी की प्रदूषणाने ग्रासलेला, पाण्यासाठी संघर्ष करणारा आणि उष्णतेने होरपळणारा ग्रह? हा निर्णय आजच्या पिढीला घ्यावा लागणार आहे. निसर्गाशी युद्ध करून मानव कधीच जिंकू शकत नाही. कारण शेवटी निसर्ग आपला समतोल स्वतः निर्माण करतो, पण त्याची किंमत मानवजातीला चुकवावी लागते. कोरोना महामारीनेही आपल्याला हेच शिकवले की, निसर्गाचा अतिरेकाने ऱ्हास केल्यास त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात.
पर्यावरण वाचविणे ही आता केवळ सामाजिक जबाबदारी राहिलेली नाही, तर ती अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे पर्यावरण दिन हा केवळ उत्सव न राहता तो आत्मपरीक्षणाचा दिवस व्हायला हवा. झाडे लावण्यापेक्षा झाडे जगविण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणाऱ्या धोरणांविरोधात समाजाने जागृतपणे आवाज उठवला पाहिजे. अन्यथा भविष्यातील इतिहास आपल्या पिढीची नोंद “स्वतःच्या विकासाच्या हव्यासापायी पृथ्वी उद्ध्वस्त करणारी पिढी” अशी करेल. आपणास व आपल्या परिवारास जागतिक पर्यावरण दिनाच्या हिरव्यागार शुभेच्छा!
चला…फक्त झाडे लावू नका, ती जगवण्याची जबाबदारीही स्वीकारूया…
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया…
प्लास्टिकमुक्त आणि प्रदूषणमुक्त भारत घडवूया…
निसर्गाचे रक्षण हीच खरी मानवसेवा आहे. भावी पिढ्यांसाठी हिरवीगार, स्वच्छ आणि सुरक्षित पृथ्वी निर्माण करण्याचा संकल्प करूया!
“निसर्ग वाचला तरच मानवजातीचे अस्तित्व टिकेल.”
✒️प्रविण बागडे(नागपू)मो:*9923620919















