


✒️लातूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
लातूर(दि.30एप्रिल):-निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरातील तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेने केला आहे. या प्रकरणात महसूल यंत्रणेच्या भूमिकेची चौकशी करून संबंधित तलाठी श्री. बालाजी नरवटे यांच्यावर भ्रष्टाचाराची कारवाई करून तात्काळ बदली करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
संघटनेने दिलेल्या निवेदना नुसार, नदीपात्रातील अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी ६ एप्रिल २०२६ रोजी निवेदन देऊनही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित तलाठी सामान्य नागरिकांकडून विविध कामांसाठी मोठ्या रकमेची मागणी करीत असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. काही स्थानिक अधिकाऱ्यांचा व राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळे परिस्थिती गंभीर बनल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
संघटनेने इशारा दिला आहे की, येत्या १० मे २०२६ पर्यंत प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनादरम्यान होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संस्थापक अध्यक्ष श्री विशाल वसंतराव सूर्यवंशी.अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेने केली आहे.














