


आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एक प्रबळ समाजसुधारक,स्त्री शिक्षणाची गंगोत्री,विधवा महिलांच्या मुलांसाठी आश्रयस्थान सुरू करणाऱ्या बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या संस्थापक,ज्योतीराव फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्व समर्थपणे सांभाळणाऱ्या,मानवी हक्कांच्या खंबीर पुरस्कर्त्या ,
संपूर्ण आयुष्य अज्ञान,जातीभेद आणि स्त्रियांवरील अत्याचारांविरुद्ध लढा देणाऱ्या क्रांतिकारक,दि.१ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन करून शाळेत मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्यावर शेण,दगड आणि चिखल फेकत असत अशादगड धोंड्याच्या वर्षावातून फुललेली फुलराणी,हुंडा न घेता पुरोहितांशिवाय सत्यशोधक विवाहाची पद्धत सुरू करणाऱ्या, स्वतःच्या कवितांमधून “विद्या मिळवा, शिका आणि स्वावलंबी व्हा” असा संदेश देण्याऱ्या,
समाजातील अज्ञान दूर करून ज्ञानाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘ज्ञानज्योती’ ,
स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी पहिला लढा पुकारणाऱ्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या जननी,हजारो निराधार आणि अज्ञानी मुला-मुलींना अक्षरांची ओळख करून देणाऱ्या अक्षरमाता ,
आधुनिक मराठी कवितेच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र वंदन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दि.३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांचे बालपण पारंपरिक वातावरणात गेले. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी त्यांचा विवाह जोतीराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला.लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना आपल्या मळ्यात मातीची पाटी आणि बोटाची लेखणी करून लिहायला आणि वाचायला शिकविले. सावित्रीबाईंना शिक्षिकेचे प्रशिक्षण दिले.तत्कालीन काळात मुलींना शिक्षणाची बंदी होती.सावित्रीबाई आणि जोतीरावांनी दि.१ जानेवारी १८४८ रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.या शाळेत सावित्रीबाईंनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. पुढे त्या मुख्याध्यापिका झाल्या .भारतातील पहिल्या महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले होतं. भिडेवाड्यात मुलींना शिकविण्यासाठी जात असताना सनातनी लोक त्यांच्यावर शेण आणि दगड मारून फेकत असत. या विरोधामुळे सावित्रीबाईंनी सोबत नेहमी एक साडी ठेवण्यास सुरुवात केली, पण शिक्षण देणे थांबविले नाही. फुले दांम्पत्यांनी 1848 ते 1852 या चार वर्षात पुण्यात व आजूबाजूला 18 शाळा स्थापन केल्या.दलित व मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणासाठी विद्येचे दारं उघडली.
त्या आपल्या ‘काव्य फुले’ या काव्यसंग्रहात म्हणतात की,
” विद्या हे धन
आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून
त्याचा साठा जयापाशी
त्याला ज्ञानी मानती जन “
“विद्या हे धन आहे, ते कुणीही चोरू शकत नाही आणि लोक त्याला ज्ञानवंत मानतात .” असा संदेश सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिला.
सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणच नव्हे तर सामाजिक विषमतेविरुद्धही लढा दिला. त्यांनी विधवांच्या होणाऱ्या छळाविरुद्ध आवाज उठविला विधवा महिलांचे केशवपन करीत व त्यांना विद्रूप करीत , त्या महिलांकडे बघून सावित्रीबाईंना खूप दुःख होत असे.महिलांची दया येत असे , म्हणून त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.सावित्रीबाईंनी त्यांना विधवा महिलांचे केस वपन का करू नये , याविषयी मार्गदर्शन केले, समजावून सांगितले . त्यांचा हा संप यशस्वी झाला व नाभिकांनी विधवांचे केशवपण करणे बंद केले .
तत्कालीन काळात बाल जरठ विवाह होत असे.त्यामुळे म्हाताऱ्या नवऱ्याचे निधन झाल्यावर बाल विधवांच्या जीवनात फार मोठे दुःख निर्माण होत होते.त्यांचा उपभोग घेणारे नराधम होणाऱ्या बाळाचा व त्या विधवा स्त्रीचा स्वीकार करीत नसत. अशावेळी बाळाचे संगोपन कोण करेल? हा प्रश्न बाल विधवांसमोर निर्माण होत होता. हे सावित्रीबाईच्या व जोतीरावांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विधवांच्या सुरक्षिततेसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृहाची” स्थापना केली.त्यांनी अनाथ मुलांना आश्रय दिला.
पुण्यामध्ये मुळा मुठा नदीवर महात्मा फुले यांना एक स्त्री आत्महत्या करताना दिसली तेव्हा त्यांनी तिला विचारले की, तू काय करतेस? तेव्हा तिने उत्तर दिले की,” मी काशीबाई एक ब्राह्मण विधवा आहे.माझ्या पोटामध्ये जे बाळ आहे .ज्याने माझा उपभोग घेतला तो या बाळाचा स्वीकार करायला तयार नाही माग मी जगून काय करू म्हणून मी आत्महत्या करीत आहे.” महात्मा फुलेंनी तिला सांगितले की ,” तू मला धर्मपिता समज मी तुला धर्मकन्या समजतो .तू माझ्या घरी चल, माझी सावित्री तुझे बाळंतपण करेल . तू तुझ्या मुलाला जन्म दे . त्याचे संगोपन आम्ही करू .” तिने होकार दिला.तिला ते घरी घेऊन गेले. सावित्रीबाईला पूर्ण कहाणी सांगितली. सावित्रीबाईंनी तिला स्वीकारले. तिच्यापासून जो बाळ झाला त्याला फुले दांपत्याने दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले पुढे त्याला शिक्षण दिले डॉक्टर केले .असे हे फुले दांपत्य जगावेगळे काम करीत होते.
जे आपण आजही करण्याचे धाडस करू शकत नाही अस्पृश्यता निवारण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला. शाळा सुरू करून त्यांना शिक्षणाची दारे उघडी केली. सत्यशोधक समाजाच्या कार्यात त्यांनी जोतीरावांना खंबीर साथ दिली आणि त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे नेतृत्वही केले. १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. रुग्णांची सेवा करीत असतानाच त्यांना प्लेगची लागण झाली आणि दि.१० मार्च १८९७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षण दिल्यामुळे आज भारतातील स्त्रिया सर्वच क्षेत्रांत प्रगती करत आहेत.सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या महान समाजसेविका स्त्रीमुक्तिदात्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या १२९ व्या सृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
✒️प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले9अमरावती)मो:-८०८७७४८६०९














