


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.25एप्रिल):– भारताची जनगणना होत आहे व सध्या त्या जनगणनेचे प्रशिक्षण ठिकठिकाणी सुरू आहे.जनगणनेच्या पहिल्या फेरीत घरांना क्रमांक देण्याचे काम होणार आहे व प्रत्यक्षात जणगणना ही जानेवारी २०२७ मध्ये होणार असल्याचे कळते.
सध्या विदर्भात कडक उन्हाळा आहे.साधारणपणे ४३,४४,४५ अंशावर तापमान गेलेले आहे.इतक्या कडक उन्हाळ्यात शिक्षकांना जनगणना व बी.एल.ओ.ची कामे देणे हे धोकादायक व जीवघेणे आहे.
नुकत्याच दि.२२ एप्रिल २०२६ पर्यंत शासकीय आदेशानुसार इयत्ता ५ ते ९ च्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत.विद्यार्थ्यांचे पेपर्स तपासणी ,मूल्यमापन व परीक्षेचा निकाल घोषित करण्याचे काम अजून बाकी आहे.खाजगी माध्यमिक शाळेच्या शिक्षकांना विद्यार्थी प्रवेशासाठी दारोदार भटकावे लागते.
आपली मूळ कामे सोडून शिक्षकांना इतर अशॆक्षणिक कामात गुंतविण्यात येत आहे.शाळेला जर आवश्यक विद्यार्थीसंख्या मिळाली नाहीतर शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागते.काही शिक्षकांना बी.एल.ओ.ची कामे दिलेली आहे.शाळा,परीक्षाकाळात बी.एल.ओ.च्या सभा केव्हाही ठेवल्या जातात.आता दि.२ मे २०२६ पासून उन्हाळी सुट्टी आहे.परंतू शिक्षकांना उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांसाठी भटकंती करावी लागते.
तरी अशा व्यस्त कालावधीत व कडक उन्हाळ्यात शिक्षकांना दिलेली जनगणनेची व बी.एल.ओ.ची कामे तूर्त स्थगित ठेवून ती जुलॆ २०२६ पासून सुरू करावी अशी आग्रही मागणी राजेंद्र मोहितकर प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा यांनी केलेली आहे.














