Home महाराष्ट्र राजकारणात सेवानिवृत्तीचे वय असणारच नाही का?-ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांचे मनोगत !!

राजकारणात सेवानिवृत्तीचे वय असणारच नाही का?-ज्येष्ठ पत्रकार हेरंब कुलकर्णी यांचे मनोगत !!

97

✒️जगदीश का.काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

शरद पवार यांना वयाच्या ८५ व्या वर्षी राज्यसभेचे उमेदवारी जाहीर झाली. पवार राज्यसभेतून निवृत्त होतील तेव्हा त्यांचे वय ९१ इतके असणार आहे. ज्या माणसाने आयुष्यात साठ वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम केले त्या व्यक्तीला वयाच्या इतक्या शेवटच्या काळात पुन्हा हट्टाने पद का हवे असेल? हे समजण्या पलीकडे आहे.. आणि आता सत्तेची सूत्रही हातात येण्याची शक्यता नसताना हा हट्ट का असेल…?

फार पूर्वी शंकर दयाळ शर्मा राजघाटावर प्रार्थनासभेत राष्ट्रपती असताना तोल जाऊन खाली पडले होते तेव्हा वृत्तपत्रांनी ते फोटो छापण्यात औचित्य भंग झाला अशी टीका झाली होती पण इतक्या वृद्ध व्यक्तीनी ही पदे स्वीकारताना औचित्य भंग होत नाही का याची चर्चा आता करायला हवी…

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवू नका म्हणून आम्ही गेले अनेक वर्षे विरोध करतो आहे. याउलट निवृत्तीचे वय ५० ते ५५असावे अशी आमची मागणी आहे. मी स्वतःही चार वर्ष अगोदर सेवानिवृत्ती घेतली आहे, त्यामुळे या विषयावर बोलण्याचा नक्कीच अधिकार आहे..

 प्रशासकीय सेवेत निवृत्त होताना शारीरिक क्षमता मानसिक क्षमता कमी होतात हे कारण दिले जाते मग राजकारणात या क्षमता नेमक्या कशा काय वाढतात ? आजही शरद पवारांना कडेचे रक्षक चालताना, पायरी चढताना मदत करतात तरीही या पदांचा अट्टाहास का आहे ?

  राजकीय पदे हे पूर्णवेळाचे काम आहे.तिथे निर्णय घ्यायचे असतात ,वेळ द्यायचा असतो. प्रशासकीय गुंतागुंत समजून घ्यायची असते. अशावेळी शारीरिक क्षमता हा मुद्दा उरत नाही का ? वयाच्या ७५ चा निकष लाऊन अडवाणींना राजकारणातून बाद करण्यासाठी मार्गदर्शक मंडळात पाठवले गेले.. पण त्यातील राजकारण सोडून तो खरे तर नियम व्हायला हवा 

खासदार होण्याचे वय जसे नक्की आहे असे न होण्याचे वय सुद्धा नक्की झाले पाहिजे.. याच महाराष्ट्रातील नानाजी देशमुख यांनी वयाच्या एका टप्प्यावर सत्ता मिळत असताना सुद्धा राजकारणातून निवृत्ती घेऊन मोठे सामाजिक काम उभे केले मला नेहमी वाटते शरद पवारांविषयी महाराष्ट्रात आणि भारतात आदराची भावना आहे. वयाच्या ७५ व्यावर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन फक्त शेती आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रातील नव्या पिढीला मार्गदर्शन केले असते तर सर्व पक्षाच्या सरकारने आणि सामाजिक संस्थांनी डोक्यावर घेतले असते

आज एका पक्षाच्या एका गटाचे नेते ही त्यांची बनलेली छोटी प्रतिमा खूप मोठी बनली असती पण जे आपल्याला समजते ते त्यांना का समजत नसेल..?

पण या निमित्ताने आता राजकारणातल्या निवृत्तीच्या वयाची चर्चा करायला हवी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here