Home महाराष्ट्र भारतीय संविधान अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

भारतीय संविधान अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

200

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.29नोव्हेंबर):-सायन पुर्व स्थित सायन काळा किल्ला जवळील जोगळेकरवाडी म्युनिसिपल शाळा संकुल मधील सुप्रसिध्द ‘ज्ञानविकास नाईट हायस्कुल’ येथे भारतीय राज्यघटनेचा सन्मानार्थ “भारतीय संविधान अमृत महोत्सव” प्रिन्सिपल भिमराव परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

ह्या महोत्सवाचे समालोचन मराठी भाषा तज्ञ प्रा. पुंडलिक सुर्यवंशी यांनी केले तर ह्या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून शबनम शेख फाऊंडेशनच्या संचालक शबनम शेख यांची विशेष उपस्थिती होती तर मासूम संस्थेचे गणित तज्ञ अजित केमनाईक, इंग्रजी भाषातज्ञ विनोद पोकळे, विज्ञान प्रात्यक्षिके तज्ञ रुपेश नकाशे, ज्ञानविकास नाईट हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे जितेंद्र कांबळे गुरुजी यांच्यासह वर्ष २०२५ – २०२६ मधील इयत्ता आठवी, नववी, दहावी विद्यार्थी, विद्यार्थिनी वर्ग सहभागी झाले होते.  

भारतीय संविधानाचा सन्मान राखत महोत्सवाची सुरूवात सुशोभित स्वरुपात सजावट केलेल्या मेज भारतीय संविधान आणि प्रस्ताविकेच्या प्रतिमांना मानवंदना देत प्रथम सामुहिक प्रस्ताविका वाचन केले गेले. 

विद्यार्थ्यांना संबोधित करताना संविधानाचे महत्व सांगताना जितेंद्र कांबळे गुरुजींनी आदर्श पारिवारिक कुटुंबातील जशी शिष्टता महत्वाची असते तशी भारताची राज्यघटना महत्वाची आहे, असे सोप्या शब्दात मांडून कमी मार्काचा पण देशाचे संरक्षण कवच असलेल्या नागरिक शास्त्र विषयाला विद्यार्थ्यांनी महत्व द्यावे, असे मौलिक मार्गदर्शन केले, तर ज्या देशात राष्ट्रगीताचा सन्मान होतो, तिथे लोकशाही नांदते, असे प्रतिपादन करत संविधानावर आधारित संविधान जनजागृतीपर कविता सादर करत रुपेश नकाशे सरांनी सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला. तसेच, भारतीय संविधानामुळे भारतातील तळागाळातील प्रत्येकाला स्वतंत्रपूर्ण सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार व नितिमत्ता एका साच्यात बसवून मौल्यवान मतदानाचा हक्क देत देशाचे शासन नेमण्याचा अधिकार देणाऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान प्रत्येक भारतीयांनी राखले पाहिजे, असे मनोगत प्राचार्य पुंडलिक सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. यानंतर इयत्ता आठवी, नववी, दहावी मधील विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थीनींनी भारतीय संविधान अमृत महोत्सव निमित्त सन्मानार्थ कविता व गीते सादर केली.

 मुख्याध्यापक प्रा. भिमराव परदेशी यांनी भारतीय संविधानाचे महत्व आणि शाळेय शिक्षणाचे महत्व समजवून भारतीय संविधान प्रत्येक तळागाळातील प्रत्येक व्यक्तींसाठी किती महत्वाचे आहे, हे मौलिक विचारातून मार्गदर्शन केले.

अमृत महोत्सवाच्या शेवटी ज्ञानविकास नाईट हायस्कुल माजी विद्यार्थी संघटनेचे जितेंद्र कांबळे गुरुजी यांनी भारतीय संविधान अमृत महोत्सवाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ त्यांची मौल्यवान स्वाक्षरीची प्रतिकृती असलेल्या मौल्यवान धातूरहित हस्तशिल्पातून साकारलेली नक्षीदार जडित “लेखणी महामानवाची” ह्या शिर्षकाखाली पेनांच्या शृखंलेचे उद्घाटन उपस्थित मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे आणि शिक्षक वृंदांच्या हस्ते करत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली आणि ऑनलाईन उद्योजक क्षेत्रात आकर्षक मौल्यवान आणि हस्तशिल्प असलेल्या पेनाचे पदार्पण सुरु केले. सामुहिक राष्ट्रगीताने ह्या अमृत महोत्सव संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here