


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
गडचिरोली(दि.19मार्च):-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस सरकारणे सुरु केलेली महत्वपूर्ण योजना असून, या योजनेतून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आजपर्यंत रोजगार निर्मिती झाली आहे. मात्र सद्या परिस्थित रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या अनेक मजुरांचे मजुरीचे हप्ते थकीत असल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे व त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे त्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीने देण्यात यावे अशी मागणी गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेत केली.
त्याच बरोबर शेतात खोदण्यात आलेल्या सिंचन विहिरीचे थकीत असलेले हप्ते सुद्धा तातडीने देण्यात यावे व मनरेगा योजनेतून ज्यापद्धतीने वार्षिक 100 दिवस रोजगार देण्याची हमी दिल्या जाते, मात्र प्रत्यक्षात 50 % दिवसच रोजगार निर्मिती होत आहे, अश्या ठिकाणी पूर्णपणे 100 दिवस रोजगार देण्याची व्यवस्था करण्यात यावी अशीही मागणी खासदार डॉ. किरसान यांनी यावेळी केली.














