


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपला राजकीय यश मिळाले आहे किंवा ज्या राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत, त्या राज्यांना अर्थसंकल्पात झुकते माप मिळाले आहे. पण महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आले नाही. हा एकप्रकारे महाराष्ट्राला दिल्लीसमोर झुकवण्याचा प्रयत्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला वर्ग, तरुण अशा सर्वांचीच निराशा करणारा असल्याची टीका आमदार देवेंद्र भुयार यांनी केली.
महाराष्ट्रातून वेदांता-फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प गुजरातला नेण्यात आले. वित्तीय केंद्र तिकडे नेण्यात आले, त्यांना अधिक सवलती देण्यात आल्या. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला नेले. तरीही ज्या महाराष्ट्रातून उद्योग अन्यत्र गेले त्यांना काहीच मिळाले नाही. हा महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.













