


कराड : (दि. 3, प्रतिनिधी) “महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले जनकल्याणासाठी एकरूप झालेले आदर्शवत दांपत्य होते. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षित करून विधवा महिलांना देखील सन्मानाने जगण्याचा आधिकार आहे. यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. काळाच्याही पुढे विचार करणाऱ्या त्या विवेकशील महिला होत्या. जातिभेद व धर्मभेद टाळून समाज उद्धाराचे त्यांनी महान कार्य केले. माणूस हा एकमेव विवेकशील प्राणी असून प्रत्येकाचा वैचारिकव्यूह हा जातीनेच ठरतो असतो. आजच्या मुली आणि महिलांनी कौशल्य आत्मसात करून विचारानेदेखील प्रगल्भ झाले पाहिजे. आपली भारतीय संस्कृती विवेक आणि नैतिकता शिकवणारी असून आजच्या समाजाला नैतिक व विवेकवादी शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे.” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या माजी राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीमती भारती पाटिल यांनी केले. त्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमालेत साधनव्यक्ती म्हणून “सावित्रीबाईंच्या विवेकवादी शिक्षणाचे काय झाले..?” या विषयावर बोलत होत्या. तत्पूर्वी मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कु. प्राजक्ता कदम हिने ‘सावित्रीची लेक” ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफहुसेन नसिरुद्दीन मुल्ला यांनी भूषविले. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, “लेक ही मायेचा सागर असते. लेक माहेरचा आधार असते. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी केलेल्या महान कार्याची आपणास जाणीव असणे महत्वाचे आहे. तसेच आपल्या कृतीतून समतेचा विचार जगविला पहिजे.”
तर प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे विश्वस्त व सदस्य मा. श्री अरुण पाटिल (काका) हे उपस्थित होते. याचबरोबर यशवंतराव चव्हाण कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत केंगार उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी यांनी प्रास्ताविक सादर करताना सर्वांचे स्वागत करून सदर व्याख्यानमालेचा हेतू कथन केला.
सदर कार्यक्रमात प्रमुख साधनव्यक्ती व अध्यक्ष यांचा परिचय डॉ. डी. के. नगरकर यांनी करून दिला. तर आभार प्रा. श्री आर. ए. कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. श्रीमती एस. पी. पाटिल यांनी केले.
सदर व्याखानासाठी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड व यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड या दोन्ही महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.













