


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.27मे):- महाराष्ट्र राज्य सहकारी धान्य खरेदी महामंडळ अंतर्गत प्रादेशिक कार्यालयामार्फत जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांकडून उत्पादित धान्य (भात) खरेदीस सुरूवात केली गेली. नव्या नियमावलीनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान्य ठरवून दिलेल्या खरेदी केंद्रांवर जमा केले, पण उन्हाळी हंगाम संपत आला तरीपण बँक खात्यावर पैसे जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. आता ही नाराजी दोन दिवसात संपणार आहे.पावसाळी धान खरेदीचे प्रलंबित पैसे दोन दिवसात जमा करण्यात येणार असल्याचे अजय बिसने पणन अधिकारी यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी पीककर्ज, पेरणी खर्च, इतर शेतीविषयक गरजांसाठी बँका व पतसंस्थांकडून कर्ज घेतले आहे. शासनाच्या नियमानुसार मार्च अखेरपर्यंत कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याज सवलत तसेच ५० हजार रूपयांपर्यंत शासन अनुदानाचा लाभ मिळतो, परंतु धान्यविक्रीचे पैसे मिळाले नसल्याने कर्जफेड करणे कठीण झाले आहे. परिणामी, अनेक शेतकरी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धान्यविक्री करूनही पैसे मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेत मिळणे गरजेचे आहे. भविष्यात धान खरेदीचे पैसे वेळेत मिळावे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.
———————————-
धान खरेदीचे पैसे वेळेत मिळाले नसल्याने माझा परिवार आर्थिक संकटात सापडला आहे. आम्ही सरकारच्या खरेदीवर विश्वास ठेवतो परंतु पैसे उशिरा दिल्याने उपासमारीची वेळ येते. – रामहरी ठेंगरे, चिखलगाव
———————————-
पावसाळी हंगाम संपला आणि आता उन्हाळी हंगाम संपत आला तरीपण आम्ही धान खरेदी पैसाच्या प्रतीक्षेत आहोत. शेतीच्या उदारीमुळे दुसऱ्या हंगामाचे काम होत नाही. त्यामुळे मानसिक त्रासाला समोर जावं लागते.- हरिभाऊ टिकले, पिंपळगाव.















