


🔸झोला शाळेत लोकशाहीर व लोकमान्य यांना अभिवादन
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.8ऑगस्ट):-शोषित आणि पीडित घटकांचे दुःख अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून मांडले. तत्कालीन समाज व्यवस्थेवरही त्यांनी कडाडून प्रहार केला. तसेच उपेक्षित आणि वंचितांना आपल्या साहित्याचे नायक केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ मुख्याध्यापक माणिक नागरगोजे यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त प्रतिमापूजन मुख्याध्यापक माणिक नागरगोजे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जाधव यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना नागरगोजे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लाल-बाल-पाल मध्ये लोकमान्य टिळक यांचा समावेश होता. भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक अशा विविध भूमिका त्यांनी पार पाडल्या. ते स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच! या घोषणेसाठी ते ओळखले जातात. १८८१ ते १९२० या ४० वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, उजाडले पण सूर्य कुठे आहे, टिळक सुटले पुढे काय, प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल? असे अग्रलेख चांगलेच गाजले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम टोमके यांनी केले. तर आभार नवनाथ जाधव यांनी मानले. यावेळी बालाजी दराडे, मिनाक्षी व्यवहारे, सविता सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.














