


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.24मार्च):- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून जवाहर नवोदय विद्यालयात 75 टक्के जागा ह्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवलेल्या असताना सुद्धा नगरपरिषद चिमूर, नगर पंचायत सिंदेवाही, नगरपरिषद ब्रम्हपुरी व संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील इतर शहरी विद्यार्थ्यांनी ग्रामीण मधून फॉर्म भरून नवोदय यादीत स्थान मिळवून ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेशा पासून वंचित केले.
नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील शाळा मधील विद्यार्थी शहरी, नागरी (अर्बन) संबोधित असून त्यांना त्यांच्या क्षेत्रात भरपूर भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असतात. मात्र त्यानी ग्रामीण मधून प्रवेश यादीत स्थान मिळवून खऱ्या ग्रामीण, गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय केला असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नवोदय निवड यादीत दिसून येत आहेत.
या निवड यादीतील 20 ते 25 च्या संख्येत असणाऱ्या बोगस ग्रामीण विद्यार्थ्यांना संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांनी ग्रामीणचे प्रमाणपत्र देऊ नये, संबंधित बोगस विद्यार्थ्यांची वर्ग 3, 4,व 5ची गुणपत्रिका व त्याची शाळा ग्रामीण की शहरी क्षेत्रात येते याची रीतसर चौकशी करूनच त्यांना प्रमाणपत्र दयावे, या मागणीकरिता ग्रामीण पालकांनी चिमुरचे तहसीलदार श्रीधर राजमाने यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालिका क्षेत्रातील बोगस ग्रामीण विद्यार्थ्यांना नवोदय मध्ये प्रवेश देऊ नये व खऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक व सामाजिक अन्याय दूर करावा अशी ग्रामीण क्षेत्रातील पालकांची मागणी आहे.
निवेदनात ज्या शहरी भागातील शाळेतील विद्यार्थी यांचा ग्रामीण यादीत समावेश असलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची यादी देण्यात आली आहे, या गंभीर प्रकरणाची प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा दखल घेऊन अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.














