


✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.7मार्च):-सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली, द्वारे संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दिनांक 6 मार्च 2026 रोजी ‘पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ’ उत्साहात संपन्न झाला. हे समारंभ विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारी, तांत्रिक नैपुण्य, आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता आयोजित करण्यात आली. महाविद्यालयाचे सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाची प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे शेतीमित्र व लोककला पुरस्काराने सन्मानित डॉ. दिलीप अलोणे व विशेष अतिथी म्हणून डॉ. शशिकांत आस्वले, माजी लेखा आणि वित्त अधिकारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, उपस्थित होते. तसेच याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. निलेश ठवकर आणि डॉ. हुमेश्वर आनंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन आणि राज्यगीत व विद्यापीठ गीताने झाली. याप्रसंगी बोलत असताना प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप आलोणे यांनी विद्यार्थ्यांना पदवी (ज्ञान) तर आपल्यासाठी उपयोगी आहेच, त्यापेक्षाही आपल्यावर झालेले संस्कार व तयार झालेली विचार प्रणाली हे महत्त्वाची आहे असे मत व्यक्त केले. डॉ. शशिकांत आस्वले यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी जीवनात अपयश आल्यावर ती पचवण्याची हिंमत ठेवली पाहिजे आणि कष्ट, मेहनत केल्याशिवाय मोठे होता येत नाही असे समजावून सांगितले. डॉ. निलेश ठवकर आणि डॉ. हुमेश्वर आनंदे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले व पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुनंदा आस्वले यांनी विद्यार्थ्यांना आपण फक्त पदवीधर असल्याने यशस्वी होत नाही तर आपण जगात किती ताकतीनिशी, ध्येयनिशी मूल्यांवर जगतो यावर आपले यश अवलंबून असते असे मत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. अत्यंत शिस्तीने विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन डॉ. नागेश ढोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. वरदा खटी यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचा योगदान होता.














