


“नको नको पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझं चंद्र मोळी
दारात उभी सायली”
पाऊस म्हटला की अनेकाना (इंदिरा संत) ही कविता आठवते. कवितेची विविध छंद बंध आणि मुक्त रूप घेऊन दर पावसाळ्यात गावोगावी कवीच्या मैफिल सजतात.’काले मेघा काले मेघा पाणी तो बरसावो’च्या विनवणीपासून ‘उमड उमड कर आईरी घटा’ चा नाद त्यात असतो. पाऊस का हवा आणि का नको या आशयाच्या शब्दात भिजलेल्या भाव कविता रसिकांना ओले चिंब करतात. पाऊस कवितांचा असाच वर्षाव करणारा एक कार्यक्रम बदलापूर येथील उल्हास नदीच्या काठी असलेल्या सोनिवली( जि.ठाणे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संपन्न झाला. परिसरात सतत रिमझीमणारा पाऊस आणि स्मारकात विविध रंग ढंगाच्या कविताची बरसात यांची जुगलबंदीच जणू सादर झाली.
निमित्त होते’ ऋतू रानातला आणि मनातला ‘ह्या काव्य संमेलनाचे.साहित्य सेवा संस्था यांनी आयोजित केलं होतं,मुख्य संयोजक बी. अनिल तथा अनिल भालेराव यांनी ह्या काव्यसंमेलनाचे रविवार दि ३१ऑगस्ट २०२५ रोजी आयोजन केले होते.
अध्यक्षस्थानी साहित्यिक आणि समीक्षक डॉ.त्र्यंबक दुनबळे होते.कवी सुनील दुपटे शामराव
सोमकुवर,सुधाकर सरवदे आणि रमेश कांबळे यांनी विशेष मेहनत घेतली.
कवी बी.अनिल तथा अनिल भालेराव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं.तर प्रा.अनिल कवठेकर यांनी सूत्र संचलन केलं.
जीवन गांगुर्डे यांच्या कवितेने सुरुवात झाली. डॉ.प्रदीप सरोदे यांच्या ‘तांबड फुटलं माय उठली ‘कवितेने सर्वांना मुग्ध केलं.
‘नको नको वाटायचा पाऊस’या कवितेतून त्यांनी पावसात हाल होणाऱ्या आईची आठवण
जागवली.तर डॉ.संजय रामराजे यांनी’आता नेहमीचं झालं त्याचं लहरी वागणं ‘या कवितेतून निसर्गाच्या लहरीपणावर भाष्य केलं.मधुकर गायकवाड याची ‘सगळीकडे गारवा असा निसर्ग वेगळा’ ही रचना सुखद होती.राहुल गायकवाड यांनी ‘चल जाऊ आपण रानावना फिराया,मनी मोगऱ्याचा फुलवू पिसारा,’या कवितेने सर्वांना प्रसन्न केलं.
अनिल सावंत या कवीने ‘शाळेच्या दिवसाचा पाऊस’ तर शाक्यपुत्र काकडे यांनी
‘बुद्धमय भारत झाला घटनेच्या पानावर’ ही सम्राट अशोक वरील कविता ऐकवली. प्रा.राजकुमार जगताप यांची
‘ ओल्या चिंब हिरवाईत शोधतो वाट …’ कविता चांगलीच रंगली. शाहीर बाळासाहेब जोंधळे यांची
‘ भीमाचं वाटून घेतलं घर, कविता विचार करायला लावणारी होती.समाधान वाघमारे
यांचे
‘दुःख माझे कोणाला कळतं
म्हणून माझं मन जळतंय’ला जोरदार प्रतिसाद मिळाला.तर गौतम साळवे यांच्या
‘तु ऐक माझ्या भावा नको दारू पिऊ
घरी बायको पोरं नको उपासी मारू’ने डोळ्यात पाणी आणलं.
महादेव जावळे यांची
‘माझ्या मुळे वनवास झाला
रमा मी गुन्हेगार आहे तुझा’ अतिशय भावपूर्ण होती.
तर संतोष जाधव यांनी
आपल्या भोवतालच्या गर्दीला आपल्या कडून काय हवं आहे ! असा प्रश्न कवितेतून विचारला.गीताश्री नाईक
‘आठवतंय मला
तुझ्या गालावरून ओघळताना ..’.चांगली रंगली.
स्वाती आफळे यांची
‘नात्याची माळ’ आणि सुभाष आढाव यांचा ‘बालपणीचा आठवणीचा पाऊस’ आणि सदन नरवाडे यांनी जोशात सादर केलेले गीत,
‘मैं तो एस वतन में अमन चाहता हू ला खूप वाहवा मिळाली.
सिद्धार्थ मगर याच्या
‘ पाऊस कालच बरसून गेला
मोकळे करावे दुःख तसा बरसून गेला
निसर्गाला माणसाच्या विकासाची भीती आहे’ ही कविता आणि अस्मिता सावंत यांनी सादर केलेली
‘ फुलांनी बहरलेला ऋतू रानाचा
भावनांनी गंधलेला ऋतू मनाचा’सुरेख वाटली.
तुलसीदास पराडे यांनी
‘भीमाईचा बाळ’ हे गीत गायले.तर
सुरेखा गायकवाड
‘दिस पावसाळी
रात्र ओली ओली ‘
आणि तात्यासाहेब सोनवणे यांनी
कवी नारायण सुर्वे यांच्यावरील कविता दाद देणारी होती.तर बी अनिल यांनी अजून पाऊस पडतोच आहे, ही कविता सादर करत समारोप केला.
डॉ.त्र्यंबक दुनबळे
बदलापूर, जि.ठाणे














