Home विदर्भ सोशल मिडीया शस्त्रातून जनजागृती करा – एस. पी. नुरूल हसन ...

सोशल मिडीया शस्त्रातून जनजागृती करा – एस. पी. नुरूल हसन भंडारा -येथे “जिल्हा शांतता व सलोखा समिती” ची बैठक संपन्न ; ५०० हून पदाधिकारी उपस्थित

119

 

संजीव भांबोरे

भंडारा : “सोशल मिडीया एक असे शस्त्र आहे की, तात्काळ प्रशासनालाही दखल घ्यावी लागते. आज त्यावर लाखों युवक युवती आणि जनता आहे. यातूनच आपल्या शहरात कसा जातीय सलोखा कायम राहील यासाठी सोशल मिडीयातून विशेष जनजागृती करावी” असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी केले. ते भंडारा येथील पोलीस सभागृहात ( बुध. २० ऑगस्ट ) ला जिल्हा शांतता व सलोखा समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी बोलतांना असे प्रतिपादन केले. याप्रसंगी जिल्ह्यातील सुमारे विविध पदाधिकारी आणि पत्रकार बांधव, सोशल मिडीयाचे संचालक उपस्थित होते.
पोळा, श्री गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सण उत्सव काळात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावात, शहरात जातीय सलोखा कायम रहावा यासाठी या शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंचावर जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अतिरीक्त जिल्हाधिकारी रविंद जाधव, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पवनी उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम, तुमसर उपविभागीय अधिकारी डॉ. कष्मिरा संखे, भंडारा ( गुन्हे शाखा ) पोलीस निरीक्षक संदीप माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात एसपी नुरूल हसन यांनी सांगितले की, आजच्या युगात सोशल मिडीया एक असे शस्त्र आहे की प्रशासनाला सुद्धा दखल घ्यावी लागते. कुठेही घटना घडली तर सर्वप्रथम सोशल मिडीयातून हल्लाबोल होतो. आज यावर लाखोंच्या संख्येने युवकांची फौज उभी आहे. त्यांनी आपल्या शहरात, गावातील विविध सामाजिक उपक्रम, अवैध धंदे त्यांवरील विरोध करणे, नशामुक्तीची जनजागृती करावी. तातडीने दखल घेतली जाईल. पुढे अतिथी म्हणाले की, मागे एका निवडणूकीच्या अती उत्साहात काहींकडून साकोलीमधे एका जागी थोर महापुरुषांच्या पुतळ्याची गुलाल भरवून विटंबना झाली होती. त्यांचे वृत्त तात्काळ एका “साकोली मिडीया” या व्हॉट्सॲप वर झळकले होते. ती बाब भंडारा पर्यंत पोचली आणि तात्काळ साकोली पोलीस प्रशासनाने दखल घेत त्या पुतळ्याची त्वरीत स्वच्छता करीत माल्यार्पण केले व मानवंदना दिली. अशीच जनजागृती सोशल मिडीयातून केली तर जनता सुद्धा जागरूक होणार. आपण सर्व सर्वधर्म समभावाचे नागरिक असून सोशल मिडीयातून अफवांच्या प्रसारणावर विश्वास ठेवू नये. सण उत्सव काळात संपूर्ण भंडारा जिल्हा पोलिस तुम्हा सामान्य जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे. पोलीसांवर विश्वास ठेवा. धार्मिक स्थळांवर व परीसरात अवैध दारू विक्री, गांजा, डोडा अश्या विषारी पदार्थांची विक्री आढळून आल्यास तातडीने जवळील पोलीस ठाणे येथे जाऊन कळवा, त्या दोषींवर जलदगतीची दंडात्मक कारवाई केली जाईल अशी भंडारा पोलीस हमी देत आहे. यावेळी पत्रकार गोपालकृष्ण मांडवटकर, कल्याणी भुरे, राशिद कुरैशी, डी. जी. रंगारी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
येथे जिल्हा पोलीस अधिक्षक नुरूल हसन यांनी मंचावरून उतरताच आवर्जून “साकोली मिडीया” चे संचालक आशिष चेडगे यांची भेट घेतली व त्यांच्या सोशल मिडीया तातडीने जनजागृतीवर प्रशंसा करीत हस्तांदोलन केले हे उल्लेखनीय. या शांतता समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पोलीस पाटील, तंटामुक्त समिती पदाधिकारी, महिला सुरक्षा समिती, जातीय सलोखा समिती, कौमी एकता समिती, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, ईद ए मिलाद उत्सवाचे पदाधिकारी व सुमारे ५०० हून अधिक सामाजिक कार्यकर्ता आणि ग्रामीण क्षेत्रातील त्या त्या ग्रामपंचायतचे सदस्य आणि विविध समित्यांचे पदाधिकारी सदस्यगण हजर झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here