


कराड: (दि.31, प्रतिनिधी) ” पाळीव जनावरे ही शेतकऱ्यांची संपत्ती असते. जनावरे आजारी पडू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी जनावरांना चांगले खाद्य द्यावे. जनावरांचे गोठे स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. जनावरांना भरपूर हवा आणि सूर्यप्रकाश मिळावा. जनावरांना कीटकनाशकांची फवारणी करावी. जनावरांच्या शरीरावर थंड पाणी फवारावे.
जनावरांच्या गोठ्यात हवा खेळती राहावी. जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी त्यांच्या गोठ्याचे व्यवस्थापन करावे. जनावरांच्या गोठ्यात पडलेले खड्डे मुरम किंवा रेतीने भरून घ्यावेत. जनावरे आजारी पडल्यास त्याना तात्काळ औषधोपचार करा.” असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे मा. डॉ. किरण दिसले यांनी केले. ते मौजे किवळ येथे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडच्या वरिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजेनेच्या “विशेष श्रमसंस्कार शिबिरात पशुचिकित्सा व पशुसंवर्धन या विषयावर बोलत होते तसेच त्यांनी शेतकऱ्यांनी आणलेल्या गाई, म्हशी, जनावरांची तपासणी करून औषधे दिली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. सयाजी दिनकर साळुंके म्हणाले की, “पावसाळ्यात जनावरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गोठा स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जास्त आर्द्रता आणि कमी तापमान या बाबींमुळे गोठ्याचा पृष्ठभाग कायम ओलसर राहतो.
ओलसरपणामुळे गोठ्यात विविध रोगजंतूंची वाढ होऊन जनावरे आजारी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी पावसाळ्यात गोठा, खाद्य आरोग्यावर भर देऊन जनावरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.”
सदर कार्यक्रमास मा. श्री प्रदीप काशीद(सरपंच), मा. श्री. कैलास साळुंखे(उपसरपंच), मा. श्री. दिलीप साळुंखे (प्रगतशील शेतकरी), श्री. सुदाम साळुंखे,( माजी ग्रामपंचायत सदस्य), श्री. चंद्रकांत माने(माजी सरपंच) श्री. संतोष साळुंखे, श्री. महेश साळुंखे, श्री. हणमंत साळुंखे, श्री हिंमत साळुंखे श्री संतोष साळुंखे, (माजी ग्रामपंचायत सदस्य) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी एन.एस.एस. गीत सादर केले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. बोंगाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समाधान संकपाळ याने करून दिला. तर सर्व मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. एन. ए. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन जितेंद्र थोरात याने केले. या समारंभास मौजे किवळ येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच वेणूताई चव्हाण कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.













