✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नागपूर(दि.28डिसेंबर):-सामान्य नागरीकांना त्यांचे प्रश्न जिल्हास्तरावर सोडविण्याकरीता सदर कार्यवाहीमध्ये अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता ग्रामिण भागातील नागरीकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून त्याचा निपटारा करण्याकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याचा नागरीकांनी अधिकाधिक फायदा घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन केले आहे.
राज्यातील सर्व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावरील असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, मंत्रालय, मुंबई येथे स्विकारून त्यावर कार्यवाही करण्याकरीता संबंधित क्षेत्रीय स्तरावरील शासकीय यंत्रणेकडे उचीत कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याकरीता विभागीयस्तरावर मुख्यमंत्री सचिवालयाची स्थापना करण्यात आली आहे.
त्याच धर्तीवर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून कक्षाकरीता विशेष कार्य अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.