


✒️अहिल्यानगर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
अहिल्यानगर(दि.22मे):- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन २३ व २४ मे रोजी अहिल्यानगर येथे साहित्य, संस्कृती, काव्य, गझल, परिसंवाद आणि सामाजिक प्रबोधनाचा बहारदार मेळा रंगणार आहे. राज्यभरातील साहित्यिक, कवी, गझलकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्य रसिकांच्या उपस्थितीमुळे यंदाचे संमेलन विशेष ठरणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश बनसोडे आणि शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली.
संमेलनाचे उद्घाटन शनिवार २३ मे रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तथा कृषिमंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्तामामा भरणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंतराव डांगे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनापूर्वी महापुरुषांना अभिवादन करून शाहिरी जलसा सादर होणार असून शाहीर कल्याण काळे, हमीद सय्यद, भारत गाडेकर, वसंत डंबाळे यांच्यासह अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. संमेलनात “आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण”, “बदलते ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती”, “असा मी घडलो…” यांसारख्या विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.
खुले काव्य संमेलन, निमंत्रितांचे काव्य संमेलन आणि गझल संमेलन ही यंदाच्या संमेलनाची विशेष आकर्षणे ठरणार आहेत. महाराष्ट्रातील नामवंत कवी, गझलकार आणि साहित्यिक यामध्ये सहभागी होणार आहेत. रविवारी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ‘प्रारब्ध’, ‘अंतरी’, ‘माणसं अशी अन तशीही’, ‘निशब्द भावना’ या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. तसेच सुनील गोसावी संपादित ‘शब्दसंचित’ या ग्रंथाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.
यंदाच्या संमेलनात सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. डॉ. गणी पटेल आणि आयु. अशोकराव गायकवाड यांना “शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
संमेलनस्थळी स्व. अरुणकाका साहित्य नगरीमध्ये ग्रंथ विक्रेत्यांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात येणार असून वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रुपयांची पुस्तक खरेदी होण्याची अपेक्षा कार्यवाह शाहीर भारत गाडेकर यांनी व्यक्त केली.
राज्यभरातील साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या दोन दिवसीय साहित्य पर्वात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.















