Home विदर्भ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आजची स्वीकारार्हता प्राप्त होण्यामागची कारणे-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आजची स्वीकारार्हता प्राप्त होण्यामागची कारणे-ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

180

 

 

 

जगदीश का. काशिकर, विशेष प्रतिनिधी, मो. ९७६८४२५७५७.

नागपूर – काल २७ सप्टेंबर २०२५ रोजी इंग्रजी कालगणनेनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शंभर वर्षाचा झाला. येत्या २ ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर हिंदू कालगणनेनुसार संघ १०० वर्षाचा होईल. इंग्रजी कालगणनेनुसार संघ शंभर वर्षाचा होत असल्यामुळे काल नागपुरात २१ हजाराहून अधिक गणवेशधारी स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पथसंचालन केले. तर २ ऑक्टोबरला होणाऱ्या विजयादशमीच्या जाहीर कार्यक्रमात देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविद संबोधित करणार आहेत.

संघ १०० वर्षाचा होतो आहे, हा मुद्दा लक्षात घेत सध्या कोणतेही वर्तमानपत्र उघडा, किंवा टीव्ही ऑन करून कोणतीही वृत्तवाहिनी सुरू करा, संघाबद्दल मागोवा घेणाऱ्या चार दोन सकारात्मक बातम्या दिसतातच. सध्या सर्वच माध्यमांमध्ये संघावर लिहिण्याबाबत चढाओढ लागली आहे की काय असे वाटू लागते. हे बघता आता संघाची स्वीकारार्हता चांगलीच वाढली आहे असे दिसून येते.

फक्त माध्यमांमध्येच नाही, तर इतरत्र देखील संघाची स्वीकारावता वाढताना दिसते आहे. काल संघाच्या प्रार्थनेला ख्यातनाम गायक शंकर महादेवन यांनी तालासुरात गाऊन त्याच्या व्हिडिओचे लोकार्पण करण्यात आले. आज संध्याकाळी संघ गीतांचेही असेच लोकार्पण करण्यात येणार आहे. तिथेही अनेक मान्यवर गायक गाणार आहेत. आजपासून ५०-६० वर्षांपूर्वी संघ गीते गाणारे ख्यातनाम गायक एकच होते, ते म्हणजे सुधीर उपाख्य बाबूजी फडके. आज मात्र अशा गायकांची रांग उभी राहते आहे.

फक्त पत्रकार आणि गायकाच नाही, तर लेखक, उद्योगपती, कलाकार, चित्रपट निर्माते हे सगळेच आता संघाच्या जवळ येऊ बघत आहेत. गेल्या काही वर्षात संघाच्या विविध उत्सवांना देशातील मान्यवर उद्योगपतींना निमंत्रित केले जाते आणि ते देखील आवर्जून उपस्थित राहतात. काही चित्रपट निर्मात्यांनी संघात संघसंबंधात चित्रपट निर्मिती सुद्धा केली आहे. आजपासून पन्नास वर्षांपूर्वी संघ संस्थापक डॉ हेडगेवार यांच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म करण्याची हिम्मत फक्त राजादत्तांसारखेच संघप्रेमी दिग्दर्शक निर्माते दाखवू शकत होते, तर संघाच्या बाजूने लेखन करण्याची हिम्मत विद्याधर गोखलेंसारखे साहित्यिकच दाखवू शकत होते.

आजपासून ५०-६० वर्षांपूर्वी चित्र पूर्णतः वेगळे होते. संघाशी संबंधित काही मोजकी वृत्तपत्रे सोडली तर संघासंदर्भात कुठेही बातमी नसायची. आलीच तर कुठेतरी चार ओळीची बारीक टाईप मध्ये बातमी दिसायची. त्यावेळी आकाशवाणी आणि दूरदर्शन ही सरकारी माध्यमे होती. या दोन्ही माध्यमांवर संघाला कुठेही स्थान नसायचे. अनेक पत्रकार, साहित्यिक, कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, गायक इतकेच काय तर प्रशासनातील अधिकारी यांना संघ कुठेतरी पटलेला असायचा. मात्र खुलेआम ते संघासोबत येत नव्हते.

त्या काळात संघ स्वयंसेवकांकडे सुद्धा समाजात काहीसे कुचेष्टेनेच बघितले जात होते. संघ स्वयंसेवकांना आणि समर्थकांना चड्डीवाले म्हणून हिणवले जात होते. संघ स्वयंसेवक दिसला की “संघ दक्ष, मुलीकडे लक्ष” असे देखील चिडवले जात होते. तेच काय तर अनेक ठिकाणी संघाच्या शाखा लावायला गेलेल्या स्वयंसेवकंबर हल्ले सुद्धा केले जात होते. त्यांना विविध खटल्यांमध्ये गुंतवले जात होते.

ही परिस्थिती बदलायला सुरुवात झाली, ती १९७७ पासून. १९७७ मध्ये देशात प्रथमच सत्तांतर झाले. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला अक्षरशः धूळ चारून जनता पक्ष सत्तेत आला होता. त्याआधी जवळजवळ अडीच वर्ष काँग्रेसने देशात आणीबाणी म्हणजेच हुकूमशाही लागू केली होती. परिणामी सर्व विरोधक एक झाले होते. या काळात संघावरही बंदी आली होती. त्यामुळे १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत संघ स्वयंसेवकांनी आपली पूर्ण ताकद लावून जनता पक्षाच्या बाजूने काम केले, आणि जनता पक्षाला विजयी केले. त्यावेळी आधी सांगायला कट्टर विरोध करणारे डावे पक्ष आणि समाजवादी सुद्धा संघावर स्तुतीसुमने उधळू लागले होते.

त्यानंतर मात्र संघ माध्यमांसाठी बातमीचा विषय बनला. मला आठवते, १९७७ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोनच महिन्यांनी हिंदीत देशभर प्रसार असलेल्या धर्मयुग या टाइम्स ऑफ इंडियाच्या हिंदी साप्ताहिकाने संघावर चक्क कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती. त्याचवेळी मराठीत भरपूर प्रसार असलेल्या मनोहर साप्ताहिकाने देखील संघावर कव्हर स्टोरी केली होती. देशातल्या इतर अनेक प्रमुख नियतकालिकांनी देखील संघाची दखल घेतली होती. तेव्हापासूनच संघ या सर्वांसाठी दखलपात्र ठरला होता.

ही दखल नंतरच्या काळात बरीच वाढली. मधल्या काळात आधी स्तुतीसुमने उधळणाऱ्या समाजवाद्यांनीच जुन्या जनसंघातील मंडळींच्या दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यातून मग चंद्रशेखर पंतप्रधान असताना सरकारी वृत्तसंस्था असलेल्या समाचार या वृत्त संस्थेने सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या तोंडी त्यांनी न बोललेले वाक्य टाकून देशभर खळबळ उडवून दिली होती. संघ पुढील दहा वर्षात देशात सत्तेत येईल असे भाकीत बाळासाहेबांनी केल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले होते. त्यावरून देशात अक्षरशः टीकेचे मोहोळ उठले होते.

मात्र असे असले तरी संघ कधीच आपल्यावरील टीकेला उत्तर देण्याच्या भानगडीत पडत नव्हता. संघ स्थापनेपासूनच संघाचे प्रसिद्धीपासून दूर राहण्याचेच धोरण राहिले होते. त्यामुळेच या प्रकरणात देखील प्रचंड आरडाओरड झाली. मात्र संघ शांतपणे आपले काम करत राहिला.

१९८० मध्ये देशात पुन्हा इंदिरा गांधींची सत्ता आली. त्यावेळी आता संघावर बंदी लागणार की काय अशी शंका अनेकांना वाटत होती. मात्र संघ नेतृत्वाने आणि स्वयंसेवकांनी त्यांचे काम शांतपणे सुरूच ठेवले होते. नंतर संघ पुन्हा चर्चेत आला तो १९८७-८८ च्या दरम्यान. जेव्हा रामजन्मभूमीसाठी आंदोलन सुरू झाले, तेव्हापासून संघ सतत चर्चेत राहू लागला. १९९० मध्ये राम मंदिरासाठी आंदोलन झाले, तेव्हा संघ स्वयंसेवकांनीच अयोध्येला जाऊन मोठ्या प्रमाणात कारसेवा केली होती. १९९२ च्या आंदोलनात देखील संघ स्वयंसेवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला. तेव्हापासून देशातल्या सत्तेच्या राजकारणात संघाचे नाव वारंवार घेतले जाऊ लागले. ते आजही घेतले जाते आहे.

आज चित्र पूर्णतः बदललेले आहे. आज देशात सर्वोच्च पदी संघ विचारांचेच व्यक्तिमत्व विराजमान आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारे संघ विचारांचे लोक आहेत. देशातील अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये संघ विचारांचीच सरकारे सत्तारूढ आहेत. त्यामुळेच की काय पण आज संघाची स्वीकारार्हता सर्वत्र वाढलेली दिसते आहे.

अर्थात संघाची स्वीकारार्थ वाढण्यामागे संघ विचारांचे लोक सत्तेत आहेत इतकेच कारण आहे का? याचे उत्तर शोधायला गेल्यास हे उत्तर पूर्णतः बरोबर नाही हा निष्कर्ष निघतो. संघाची स्वीकारार्हता वाढली, याला कारण संघाने गत शंभर वर्षात राष्ट्र निर्माण मानाचे आणि माणसे जोडण्याचे त्याचबरोबर माणसे संस्कारित करण्याचे जे काम केले आहे, त्यामुळे संघाचे मजबूत असे संघटन उभे राहिले आहे. ज्यावेळी संघ सुरू झाला त्यावेळी संघासोबत मोजकेच लोक होते. मात्र त्यांची देशासाठी त्याग करण्याची मानसिकता होती. संघाने असेच लोक जोडले आणि त्यांच्यात त्याग करण्याची मानसिकता विकसित केली. गेल्या शंभर वर्षात लाखाहून अधिक पूर्णकालीन प्रचारक संघासाठी घरदार सोडून आपले आयुष्य देते झाले. या स्वयंसेवकांनी अगदी अपरिचित भागात जाऊन संघ वाढवला. त्या काळात विदर्भातला एखादा माणूस बंगाल आसाम किंवा अगदी थेट लाहोर पर्यंत जातो, प्रसंगी खाली केरळ कर्नाटक चेन्नई इथपर्यंत जाऊन राहतो, तिथल्या नागरी जीवनामध्ये मिळून मिसळून तिथल्या जनसामान्यांना संघाकडे आकृष्ट करतो आणि संघ विचार त्यांच्या मनात रुजवतो, हा एक अनाकलनीय चमत्कार होता. मात्र संघ विचाराच्या मंडळींनी हे घडवले. त्यामुळे संघाची आजची क्षमता आम्ही बघतोच आहोत.

संघाने गावागावात जाऊन फक्त संघ शाखा उभ्या केल्यात, असे नाही, तर समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पोहोचून तिथे आपला विचार कसा रुजवता येईल हा प्रयत्न केला. त्यासाठी मग १९३६ मध्ये संघाच्या धर्तीवर महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती उभे झाली. राजकारणात संघ विचाराच्या मंडळींचा सहभाग हवा म्हणून १९५२ मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना झाली. हिंदूंचे धार्मिक हक्क सांभाळले जावे यासाठी विश्व हिंदू परिषद उभी झाली. विद्यार्थी क्षेत्रात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कामगार क्षेत्रात भारतीय मजदूर संघ, तर शेतकरी बांधवांसाठी भारतीय किसान संघ, त्याचबरोबर सहकार भारती, संस्कार भारती, आरोग्य भारती, ग्रंथालय भारती, सामाजिक समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय साहित्य परिषद, भारत विकास परिषद अशा जवळजवळ ३६ क्षेत्रामध्ये संघाने आपल्या संघटना बांधल्या आणि काम सुरू केले. त्याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये संघाने आपल्या शिक्षण संस्था सहकारी संस्था बँका रुग्णालये असे संस्थांचे जाळे देखील उभे केले.प्रत्येक क्षेत्रात संघाने माणसे जोडली. त्यांना आपले विचार पटवून देण्यात संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक यशस्वी झाले.

त्याचबरोबर जनसामान्य सुद्धा कुठेतरी संघाचे काम बघत होते. त्यांची झोकून देत काम करण्याची वृत्ती, त्यातही कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे, हे जनसामान्यांना कुठेतरी सुखावून जाणारे होते. आज देशात पूरस्थिती असो, जातीय दंगली असो, भूकंप असो, किंवा आणखी कोणती नैसर्गिक आपत्ती असो अशा प्रत्येक वेळी सर्वात आधी धावून जाणारे संघ स्वयंसेवक राहत होते आणि आजही राहतात. विशेष म्हणजे राष्ट्रभक्ती आणि हिंदुत्वाचे रक्षण हे मुद्दे संघ नेतृत्वाने जनसामान्यांना पाठवून दिले होते. त्यामुळेच देशातील नागरिक हळूहळू संघाकडे आकृष्ट होऊ लागले. आज संघात नियमित जाणारे स्वयंसेवक आणि त्यांचे कुटुंबीय तसेच संघाशी संबंधित इतर संघ विचाराच्या संघटनांशी जुळलेले नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांची संख्या बघितल्यास देशातील जवळजवळ ५० कोटी नागरिकांपर्यंत संघ विचार पोहोचला आहे, आणि त्यांना तो पटला आहे, असे दिसून येते. त्यामुळेच आज संघ विचाराचे लोक सत्तेत येऊ शकले आहेत.

संघ विचार फक्त देशातच पोहोचला असे नाही तर परदेशात देखील संघ विचारांचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आज दिसत आहेत. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून जे काम होते, त्याच धर्तीवर देशाबाहेर हिंदू स्वयंसेवक संघ म्हणून कार्यकर्ते कार्यरत झाले आहेत. त्यासाठी संघ व्यवस्थेत विश्वविभाग सक्रिय झाला आहे. परिणामी जगभरात ठिकठिकाणी संघ स्वयंसेवक हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून मोठमोठी आयोजने करताना दिसून येतात. त्यामुळे तिथेही संघ विचार रुजवला जातो आहे.

संघाच्या १०० वर्षाच्या वाटचालीत संघाने जुन्याच प्रथा परंपरांना चिकटून न राहता आम्ही कालानुरूप परिवर्तनशील देखील आहोत हे प्रसंगा प्रसंगातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच मूळचा हाफ पॅन्ट वरचा संघ आज फुल पॅन्ट वर आलेला दिसतो आहे. कालानुरूप आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून संघ देखील हायटेक बनलेला आहे.

या परिवर्तनाला संघाचे प्रत्येक टप्प्यावरील नेतृत्व देखील कारणीभूत ठरलेले आहे. संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, नंतरचे गोळवलकर गुरुजी मग बाळासाहेब देवरस, मग प्रो. राजेंद्र सिंग म्हणजेच रज्जू भैया, मग सुदर्शनजी आणि आता डॉ. मोहन भागवत, या प्रत्येक नेतृत्वाने संघात कालानुरूप परिवर्तन कसे करता येईल हेच बघितले आहे. त्यामुळे संघ अधिकाधिक स्वीकारार्ह बनल्याचे दिसून येते.

संघ विचाराचे लोक सत्तेत आल्यावरही त्यांनी आम्ही देशासाठी काय करू शकतो हे प्रसंगा प्रसंगातून दाखवून दिले आहे. देश उभारण्यासाठी आम्ही प्रसंगी सर्वस्व त्याग होऊ शकतो ही मानसिकता आमच्यात आहे हे विविध प्रसंगातून जनसामान्यांना पटवून देण्यात संघ स्वयंसेवक यशस्वी झाले आहेत.

त्यामुळेच आज संघाची स्वीकारार्हता वाढलेली दिसते आहे. आज देशातील प्रत्येक माध्यमातून संघाची दखल घेतली जाते. रावापासून तर रंकापर्यंत प्रत्येक जण कुठेतरी संघाशी जुळतो आहे. म्हणूनच संघ वाढतो आहे आणि आता संघ शंभर वर्षांशी वाटचाल पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण करतो आहे.

असे असले तरी संघावर आजही संघ विरोधक तितक्याच ताकदीने टीका करू बघतात. विशेषतः देशात डाव्या विचारसरणीचे कथित पुरोगामी आणि काँग्रेसी मंडळी हे अशा टीका करून बुद्धीभ्रम पसरवण्यात आघाडीवर असतात. मात्र आता जनसामान्य त्यांना फारसे दाद देत नाहीत असे दिसून येत आहे. तेच संघाच्या कामाचे यश म्हणता येईल.

भारत एक समर्थ सक्षम राष्ट्र म्हणून उभे करणे भारताला विश्वगुरू बनवणे आणि हिंदुत्व हेच भारतीयत्व ही विचारधारा प्रस्थापित करणे, हेच संघाचे ध्येय राहिले आहे. याच ध्येयासाठी संघाची अविरत वाटचाल सुरू आहे आणि ती सुरूच राहणार आहे हे निश्चित दिसते आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here