


*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा (12 सप्टेंबर)-राजुरा शहरातील रेल्वे गेटमुळे नागरिकांना, प्रवाश्यांना होणारा त्रास याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राजुरा तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या वतीने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. राजुरा शहरातील मुख्य मार्गावर श्री शिवाजी महाविद्यालय जवळ असलेला रेल्वे गेट हा दररोज बराच वेळ बंद राहतो.
त्यामुळे तालुक्यातील व विशेषतः शहराच्या मध्यभागी हा गेट असल्यामुळे शहरातील नागरिकांना व शाळा , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे गेट बंद असल्यामुळे रस्त्यावर लांबच लांब वाहनांची रांग लागते,शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग, रुग्णवाहिका तसेच आपात्कालीन सेवा यांना वेळेत पोहोचणे कठीण होते. वाहतुकीची कोंडी झाल्यामुळे अपघातांचा धोका वाढतो,
नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जातो तसेच इंधनाचीही मोठ्या प्रमाणात नासाडी होते. म्हणून ह्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल/अंडरपास उभारण्यात यावा किंवा वाहतुकीची योग्य पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. यामुळे नागरिकांचा मोठा त्रास दूर होईल. या बाबीकडे लवकरात लवकर लक्ष घालावे अशी विनंती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने खासदारांना करण्यात आली. ही समस्या मार्गी लावण्यासाठी पूर्ण पणे प्रयत्न करू असे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रणय धोटे, शहर अध्यक्ष कुणाल मोकडे उपस्थित होते.














