


✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 17 एप्रिल) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने वाचन प्रेरणा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
“‘सामाजिक न्याय पर्व'” अंतर्गत सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण बार्टी पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह उमरखेड येथे करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने झाली.
सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री. राहुल कऱ्हाळे प्रकल्प अधिकारी बार्टी पुणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथ प्रेमी होते, ते जगातील सर्वश्रेष्ठ वाचकांपैकी एक होते.
इंग्लंड मध्ये शिकत असतांना तेथील ब्रिटिश वाचनालयामध्ये वाचण्यासाठी ते जात असत आणि तिथे ते 12 ते 18 तास वाचन करीत असल्याचे ते म्हणाले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले. बार्टी चा सामाजिक न्याय पर्व हा अतिशय महत्वाचा उपक्रम असल्याचे ते म्हणाले.
तसेच समाज कल्याण व बार्टीच्या यूपीएस्सी,एमपीएससी,आयबीपीएस प्रशिक्षण योजना स्वयंम सहायता युवा गट, स्वाधर योजनाची माहिती देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विद्यर्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वतिगृहाचे गृहपाल श्री. साळवे सर यांनी शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यानी भरपूर अभ्यास करावा,वाचनातूनच आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो आणि व्यक्ती ज्ञानी बनतो असे विचार मांडले.
देशाच्या उज्वल भविष्यासाठी त्यातूनच समाजाचे विश्वासू नेते निर्माण झाले पाहिजे असल्याचे सांगून समाज कल्याण बार्टीच्या सामाजिक न्याय पर्व अंतर्गत वसतिगृहात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली व 14 एप्रिल निमित्ताने विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती च्या शुभेच्छा दिल्या, वसतिगृहातील 40 विदयार्थ्यांनी सलग 6 तास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ग्रंथाचे वाचन करून वाचन प्रेरणा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहातील विद्यार्थी दिनेश जाधव यांनी केले,तर मान्यवारांचे आभार निखिल भुजबळ यांनी मानले.














