


▪️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.24एप्रिल):-सोनपेठ व गंगाखेड तालुक्याच्या सीमेवरील वैतागवाडी या गावात,जिथे बौद्ध समाजाचे एकही घर नाही,अशा ठिकाणी होलार समाजाने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या वैचारिक जयंतीनिमित्त (दिनांक २१ एप्रिल मंगळवार) रोजी होलार समाजातील महिलांनी पुढाकार घेत तसेच जयंती समितीचे अध्यक्ष पद भूषवत अत्यंत प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक कार्यक्रमाचे आयोजन करून एक आदर्श निर्माण केला.कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.मिलिंद क्षीरसागर होते,तर उद्घाटक म्हणून गावचे सरपंच विठ्ठल होरे यांनी उपस्थिती लावली.प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संविधान अभ्यासक प्रा.एम.एम.सुरनर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.अनिल सावंत,प्रा.विष्णू आसोरे, प्रभाकर सातपुते,ॲड.राजकुमार गरुड,पत्रकार महेमूद शेख,तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष आवळे, जयदेव खांडेकर,बाळासाहेब वाहुळे, मदन वाहुळे,दिलीप वाहुळे,जांबाळे पोलिस पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.विष्णू आसोरे यांनी करताना वैतागवाडी हे गाव महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडविणारे ठरेल,असा विश्वास व्यक्त केला.आज अनेक ठिकाणी जयंती म्हणजे केवळ दिखावा झाला आहे; मात्र तुम्ही समतेचा नवा विचार रुजवून बाबासाहेबांच्या विचारांचा खरा वारसा जपला आहे,असे ते म्हणाले.यानंतर मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत सदिच्छा व्यक्त केल्या.ॲड.अनिल सावंत यांनी आकाश मोजतो आम्ही, वादळही पेलतो आम्ही,भीमा तुझ्यामुळे या ओळींमधून भावना व्यक्त केल्या. ॲड.राजकुमार गरुड यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगितले,तर पत्रकार महेमूद शेख यांनी हा जयंती महोत्सव आदर्शवत असल्याचे नमूद केले.
प्रमुख व्याख्यानात प्रा.एम.एम.सुरनर यांनी अत्यंत प्रभावीपणे विचार मांडत सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी समर्पित केले.त्यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा,शिक्षणाचा, अभिव्यक्तीचा आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळाला.बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी करणे म्हणजे त्यांच्याप्रती खरी कृतज्ञता व्यक्त करणे होय,असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच त्यांनी बाबासाहेबांचे कार्य हे मानवतेला उन्नत करणारे आणि अन्यायकारक वर्णव्यवस्थेला छेद देणारे असल्याचे अधोरेखित केले.
अध्यक्षीय समारोप करताना ॲड.मिलिंद क्षीरसागर यांनी बाबासाहेबांचा मोलाचा संदेश सांगितला आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्यावे कारण भाकरी पोटाची भूक भागवते तर पुस्तक मेंदूची भूक भागवते.या विचारातून त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि बाबासाहेबांच्या आदर्शांनुसार जीवन जगण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात महिलांनी पांढऱ्या साड्या परिधान करून तर पुरुष व युवकांनी बाबासाहेबांच्या प्रतिमांचे पोशाख परिधान करून एकात्मता आणि आदर व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी आयोजकांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आवळे यांनी केले,तर आभार सूर्यकांत आवळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुक्ता आवळे, चांगुणाबाई टिकणार,गिरजाबाई होनमाने,धुराजी खांडेकर,बाळासाहेब टिकणार,लक्षमन टिकणार,नरसिंग गुळवे,सुरज आवळे,पिराजी गुळवे, विकास टिकणार,रवि टिकनर,मुन्ना आवळे,गणेश गेजगे,सीताराम गुळवे आदींनी विशेष परिश्रम घेतले














