


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.13जून):-येथील उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय,पंचायत समिती तसेच नगरपालिका कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांचा नियमानुसार तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही त्यांची बदली करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे मा.जिल्हा महासचिव शुद्धोधन सावंत यांनी केला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी परभणी यांना (दिनांक ११ जून गुरुवार) रोजी निवेदन सादर करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळातील कामांची विभागीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अधिकारी व कर्मचारी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींच्या वरदहस्तामुळे दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असून त्यामुळे प्रशासनात मनमानी कारभार वाढीस लागला आहे.खोटी व बोगस कामे,लाचलुचपत तसेच अधिकारांचा गैरवापर यांसारख्या प्रकारांना चालना मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत राहिल्यामुळे काही कर्मचाऱ्यांमध्ये हुकूमशाही वृत्ती निर्माण झाली असून ही बाब लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे.
त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून त्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामांची सखोल विभागीय चौकशी करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशी व कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.















