


मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची सर्वाधिक मदार मृग बहरावर असतांना संत्रा फळावर अज्ञात रोग आल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. फळांची झाडे पिवळी पडत आहे व काही झाडे सुकत आहेत. झाडावरील आंबिय मृग बहाराची संत्रा फळे काळे पडत आहे आंबिया व मृग बहाराच्या संत्राला मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्यामुळे या रोगावर योग्य उपाय योजना कशी करावी यासाठी संत्रा फळ उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असतांना मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता उपविभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम माने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी दापोरी, पाळा, हिवरखेड, डोंगर यावली, घोडदेव येथील विविध शेतातील संत्रा बागेला भेट देऊन संत्रा गळती होत असलेल्या संत्रा बागांची पाहणी केली.
मोर्शी तालुक्यांत संत्रा लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. सद्यःस्थितीत संत्रा उत्पादकांद्वारे आंबिया व मृग बहराचे नियोजन केले जात आहे. मात्र अज्ञात रोगामुळे संत्रा गळती आंबीया मृग बहाराच्या संत्रावर काळे डाग पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वादात असून पाने पिवळी पडण्याच्या समस्येला संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोर्शी तालुक्यामध्ये या समस्येने थैमान घातले आहे. विविध प्रकारच्या उपाययोजना करून देखील ही समस्या नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी जेरीस आले होते. अनेक शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली. त्यावर त्यांचा मोठा खर्चही झाला. परंतु आंबिया व मृग बहाराचे संत्रा फळ काळे पडत असून पाने पिवळी पडण्याच्या समस्येमुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
संत्रा आंबिया व मृग बहाराचे क्षेत्र तालुक्यांत २५ हजार हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणात आहे. आंबिया व मृग बहारात अज्ञात रोगाचे आक्रमण, फळगळती, पावसाचा खंड, वाढलेल्या तापमानामुळे आंबिया बहारात फळगळ, मृग बहारात बहार न फुटणे व फुटलेल्या बहाराची संत्रा फळांवर काळे डाग पडत आहे. फळगळीमुळे व मृग बहार कमी प्रमाणात फुटल्यामुळे संत्रा उत्पादनात घट झाली आहे. फळगळतीमुळे झालेल्या नुकसानाची वस्तुस्थिती जाणून घेणे, त्याची कारणे शोधून उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी महसूलमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली असता रुपेश वाळके यांच्या मागणीची दखल घेऊन आंबिया व मृग बहार फळगळतीसंदर्भात मोर्शी तालुक्यांतील बागांची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उप विभागीय कृषी अधिकारी उज्वल आगरकर, तालुका कृषी अधिकारी पुरुषोत्तम माने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके, उपसरपंच कांचन कुकडे, सचिन उमाळे मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, यांच्यासह तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा बागांची पाहणी करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मोर्शी तालुक्यात आंबिया व मृग बहाराच्या संत्रावर अज्ञात रोगामुळे काळे डाग पडत असून आंबिया बहाराच्या संत्रा मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याचे चार वेगवेगळी कारणे असून शकता. नेमक्या कोणत्या कारनामुळे संत्रावर डाग पडत आहे याचे निदान करण्यासाठी कृषी विद्यापीठ व लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र यांच्या शास्त्रज्ञांना पत्र लिहून पाहणी करण्यासाठी विनंती केली आहे. ते लवकरच तालुक्यातील बागांची पाहणी करून मार्गदर्शन करणार आहे. तोपर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचना दिल्या आहे.
– उज्वल आगरकर उप विभागीय कृषी अधिकारी, मोर्शी.














