


राजुरा ३० जुन
मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीतेचे जनक, सहस्त्र पैलू व्यक्तिमत्वाचे धनी, विश्वयोगी, युगप्रवर्तक वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे कार्य, तत्वज्ञान व समग्र साहित्य तसेच त्यांच्याच द्वारा संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम ची कार्यप्रणाली व तत्वप्रणाली इत्यादी बाबीच्या अभ्यासातून समाजाच्या सर्व क्षेत्रातील व सर्व स्तरातील जनतेचे जीवन सफल व्हावे व इतरांनाही साह्यभूत होवून त्यांच्या नरजन्माचे स्वार्थक व्हावं या उदांत हेतूने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम द्वारा प्रजासत्ताक दिन २६जानेवारी १९९० पासून ग्रामगीता जीवन विकास परीक्षांचा अत्यंत उपयुक्त व स्तुत्य असा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तोच उपक्रम गावोगावी प्रत्येक केंद्रावर सुरू झालेला आहे त्याचप्रमाणे सहकार नगर येथे सुद्धा ग्रामगीता जीवन विकास परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेला एकूण १११ परीक्षार्थी बसले होते आणि सहकार नगर रामपूर केंद्र क्रमांक ५४८ चा निकाल शंभर टक्के लागला. त्यानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ सहकार नगर रामपूर द्वारे ग्रामगीता जीवन विकास परीक्षेत सहभागी परीक्षार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका सेवाधिकारी मोहनदास मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून बादल बेले,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, ऍड .मारोती कुरवटकर,अभिवक्ता राजुरा, प्रकाश उरकुंडे, राजुरा तालुका प्रमुख ग्रामगीता जीवन विकास परीक्षा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रमुख अतिथी प्रकाश उरकुंडे यांनी असा उपक्रम राबवित असल्यामुळे पुस्तकाच्या माध्यमातून महाराजांचे तत्वज्ञान प्रत्येक घरात पोहचेल व त्यामुळे मानव विकास घडून येईल, ऍड. मारोती कुरवटकर यांनी आजचा बालक हा उद्याच भविष्य आहे याकरिता या बालमनावर सुसंस्कार होणे ही काळाची गरज आहे, बादल बेले यांनी ज्याप्रमाणे गुरुदेव सेवा मंडळ राबवित असलेल्या बाल सुसंस्कार शिबिरातून बालक घडत असतात त्याचप्रमाणे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा सुद्धा जीवनाचा सार आहे तसेच बालमनावर जसे संस्कार होतील तसे भविष्यात बालक घडतील असे मत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहनदास मेश्राम यांनी परीक्षार्थींना प्रोत्साहित करून अभिनंदन केले व मान्यवरांच्या हस्ते सर्व परीक्षार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसिद्धी प्रमुख देविदास वांढरे यांनी केले. संचालन अश्विनी वांढरे तर आभार सरोजनी हिवरे यांनी मानले व राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.













