


▪️दापोरी ग्राम पंचायत कार्यालयाचा अभिनव उपक्रम !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.८मार्च):-हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून जगभरात ओळखला जातो. हा महिलांच्या सन्मानाचा , हक्काचा, अधिकाराचा दिवस आहे. खरे म्हणजे या दिवशी अनेक क्षेत्रात विजयी यशस्वी झालेल्या महिलांचा सत्कार त्यांचे कौतुक करण्याचा दिवस असल्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय दापोरी तर्फे अभिनव उपक्रम राबऊन विविध क्षेत्रातील कर्तबगार कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करून यशस्विनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो. कर्तृत्व दाखवायची संधी मिळाली की, महिला ती संधी सोडत नाहीत, असे मत माजी महिला बाल कल्याण सभापती वृषाली विघे यांनी यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हा परिषद शाळा दापोरी येथे ग्राम पंचायत कार्यालय दापोरी द्वारा आयोजित महिला सन्मान सोहळा कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई विघे, माजी जिल्हा परिषद सदस्य उषाताई नागमोते, माजी सरपंच निर्मलाताई झळके, वर्षा फलके, वर्षा पाटील, सरपंच संगीता ठाकरे, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष अंकिता विघे, प्रगती सकर्डे, या कर्तुत्ववान महिलांना यशस्विनी सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून माजी सभापती सौ वृषाली वीघे, माजी जी प सदस्य उषाताई नागमोते, सरपंच संगीता ठाकरे, निर्मला झळके, वर्षा फलके , वर्षा पाटिल, सचिव विनोद राऊत, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, संध्या दारोकर, विशेष मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक गजानन चौधरी यांच्यासह आदी मंडळी प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव विनोद राऊत यांनी केले तर आभार माधुरी घोंगडे यांनी मानले. 
‘प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्याचे सक्षम उदाहरण म्हणजे आजचे आपल्या पुरस्कारार्थी आहेत. म्हणून समाज, परिवार आणि नातेवाईक यांनी काहीतरी करू पाहाणाऱ्या महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. आपला महाराष्ट्र महिला धोरणात कायम पुढे राहिला आहे. त्यामुळे महिला कर्तृत्वाच्या इतिहासात महाराष्ट्र अनेक पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरेल’ — सौ वृषाली प्रकाश विघे माजी सभापती महिला बाल कल्याण जिल्हा परिषद अमरावती.














