Home महाराष्ट्र सतर्कता पाळा ; कोरोना टाळा

सतर्कता पाळा ; कोरोना टाळा

382

 

ज्याने दोन वर्ष लोकांना घरात कोंडून ठेवले, ज्याने जगाचे अर्थचक्र थांबवले, लाखो लोकांना बेरोजगार केले, ज्याने शाळेतील मुलांना शाळाबाह्य बनवले, ज्याने हजारो नव्हे तर लाखो जणांचा बळी घेतला तो पुन्हा येतोय. हो कोरोना पुन्हा येतोय. केवळ भारतातच नव्हे तर जगात कारोना पुन्हा हातपाय पसरत आहे. मागील काही दिवसात कोरोनाने जगात पुन्हा एकदा दमदार एंट्री केल्याने जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन 1 ने भारतासह जगातील ४० देशात शिरकाव केला आहे. भारतातही या नव्या व्हेरीयंटने शिरकाव केला असून या व्हेरीयंटचा पहिला रुग्ण ८ डिसेंबरला केरळात सापडला होता. त्यानंतर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली अशा सर्वच राज्यात या व्हेरीयंटचे रुग्ण आढळून येऊ लागले. १७ डिसेंबरला तामिळनाडूत एकाच दिवशी पाच रुग्ण दगावल्याची बातमी आली प्रशासनाची चिंता वाढली. केंद्र सरकारने तातडीने सर्व राज्यातील आरोग्यमंत्र्यांची व सचिवांची बैठक घेतली . महाराष्ट्रातही या व्हेरीयंटने शिरकाव केला आहे. सिंधुदुर्ग, मुंबई करत आता हा व्हेरीयंट ग्रामीण भागातही पसरला आहे त्यामुळेच सरकार ॲक्शन मोडवर आली. राज्य सरकारने तातडीने पावले उचलली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सूचना केल्या. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनीही खबरदारीच्या सूचना देत नागरिकांना भीती नको पण सतर्कता पाळा असे आव्हान केले. आरोग्य यंत्रणेने आणीबाणीच्या काळात कसलीही त्रुटी राहू नये याची काळजी घेतली. शासन आणि प्रशासन या नव्या व्हेरिअंटशी लढण्यासाठी सज्ज आहे ही समाधानाची बाब असली तरी राज्यातील नागरिकांनीही स्वतःची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. हा नवा व्हेरीअंट घातक नाही असेही आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आले. मागील वर्षी देखील हिवाळ्यातच कोरोनाचा ओमायक्रोन हा व्हेरीअंट आला होता. तेंव्हा देखील अशीच भीती जगात पसरली होती तेंव्हा तर कोरोनाची चौथी लाट येईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र तो अंदाज फोल ठरला. आताही घाबरण्याचे कारण नाही मात्र योग्य ती खबरदारी घ्यावीच लागेल. कोरोना काळात नागरिकांना ज्या मार्गदर्शक सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या त्याचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. गर्दीत जाणे टाळावे. गर्दीत जावेच लागणार असेल तर मास्क घालूनच जावे. सॅनिटायजरचा वेळोवेळी वापर करावा. नाताळ, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या बाबी कटाक्षाने पाळाव्यात. आपल्या देशात जवळपास ९० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. वर्धक मात्रा ( बूस्टर डोस ) घेणाऱ्यांची संख्याही अधिक आहे त्यामुळे आपल्याकडे कोरोनाचा धोका इतर देशांच्या मानाने कमी आहे तरीही सतर्कता हवीच. मागील वर्षी ओमायक्रोन, यावर्षी जेएन 1 अशा नव्या उपप्रकारात कोरोना पुनरागमन करतच आहे याचाच अर्थ करोना जगातून हद्दपार झालेला नाही. कोरोना मुळासकट का हद्दपार होत नाही याचे उत्तर वैद्यक शास्त्राकडे देखील नाही. कोरोनाच्या उत्पत्ती बद्दलही अनभिज्ञता आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते कोरोना पृथ्वीवरून हद्दपार होणे अशक्य आहे तो नव्या रूपात येतच राहणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा मुकाबला करायचा असेल तर अत्याधुनिक पद्धतीनेच करावा लागेल शिवाय कोरोनाशी लढण्यासाठी जी त्रिसूत्री दिली आहे तिचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाशी लढायचे असेल तर आता सतर्कता बाळगणे हाच उपाय आहे. भीती नको पण सतर्कता पाळा, कोरोना टाळा हा नवा मंत्र सर्वांनी अंगिकारला पाहिजे.

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here