


✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.21मार्च):-अमेरिकन न्याय विभागाने एपस्टीन फाईल्स संदर्भातील काही माहिती जाहीर केली आहे. या संदर्भात माध्यमांमधून प्रसारित झालेल्या माहितीवरून असे दिसून येते की, ही जगातील मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत क्रूर आणि अमानवीय घटना आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि त्या अनुषंगाने अनेक क्रूर घटना या एपस्टीन फाईल्समधून जगासमोर आलेल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व बाबतीत मौन धारण करून बसलेले असून, या फाईल्सच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी हे काही राष्ट्रांच्या प्रमुखांसमोर नाचले, असा उल्लेख आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी भारताचे सार्वभौमत्व व स्वाभिमान गहाण ठेवले, असे चित्र देशासमोर निर्माण झाले आहे.
नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने यापूर्वी नैतिकतेचा खोटा आव आणून सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका केली. आज एपस्टीन फाईल्सच्या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि भाजपचे खरे चारित्र्य लोकांसमोर आले आहे.
भारताचे विस्कळीत आणि दिशाहीन झालेले भारतीय परराष्ट्र धोरण आणि गहाण ठेवलेले भारताचे सार्वभौमत्व यासाठी सर्वस्वी नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस जबाबदार आहे. कारण आरएसएस हा भाजपाचा मुख्य केंद्रबिंदू असून, आरएसएसने भारतीय जनता पक्षासाठी निवडणुकांमध्ये उघडपणे काम केलेले आहे, त्यांच्यासाठी मते मागितली. त्यामुळे संघ ज्या नैतिकतेच्या मुद्यावर लोकांना आव्हान करते, त्या नैतिकतेच्या निकषांमध्ये देशाचे पंतप्रधान बसतात का? हे आरएसएसला विचारणे क्रमप्राप्त आहे.
या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने व सहकारी पक्ष संघटनांचा संयुक्त मोर्चा सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वा. नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. संविधान चौक, नागपूर येथून हा संयुक्त मोर्चा आरएसएसच्या मुख्यालयावर जाणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, नागरिक, महिला भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.














