


डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एक नाव नाही… ते एक परिवर्तन आहे, एका युगाचे प्रबोधन आहे, मानवमुक्तीचा संकल्प आहे. महापरिनिर्वाण दिन हा त्यांना केवळ स्मरण करण्याचा दिवस नसून त्यांच्या विचारांचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे.
*लोकशाहीचा आत्मा हरवतो आहे*…
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्नात पाहिलेली लोकशाही ही मानवाच्या प्रतिष्ठेवर आधारित होती—
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारख्या चार स्तंभांवर उभी असलेली लोकशाही!
पण आजच्या परिस्थितीकडे
पाहिल्यास मन विषण्ण होते—
निवडणुकांमध्ये पैसा, दारू, मटण यांचा खेळ…
मतदार राजाला आकर्षित करण्याची गलिच्छ स्पर्धा…
सत्तेचे मोह जपणारे नेते आणि
शासन–प्रशासन धृतराष्ट्रासारखे डोळे उघडे ठेवूनही बंद करून बसलेले…
हीच ती लोकशाही होती का, ज्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य झिजवले?
*१४० कोटीची आई रमाईचा त्याग – बाबासाहेबांची ऊर्जा*
आपल्या कुटुंबाच्या सुखाकडे न पाहता, रमाईने एकेक क्षणी केलेला त्याग ही बाबासाहेबांची खरी शक्ती होती.
शरीर दुर्बल झाले, आरोग्य खालावले, पण भारताचे संविधान लिहिताना मात्र त्यांची लेखणी भारताच्या भविष्याला प्रकाश देत राहिली.
त्यांच्या संविधानाने—
मुके बोलू लागले…
आंधळे पाहू लागले…
लंगडे धावू लागले…
कारण संविधानाने माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला.
समाजाच्या रचनेत त्यांच्या विचारांची गरज
आज समाजात—
विषमता पसरविण्याचे प्रयत्न,
धार्मिक अंधश्रद्धा व कट्टरता,
जातीय द्वेष व विभाजनाची भाषा वाढताना दिसते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते भारत बौद्धमय व्हावा, म्हणजे—
बुद्धाच्या करुणेचा मार्ग,
शांततेचा मार्ग,
विवेक आणि प्रमाणवादाचा मार्ग समाजाने स्वीकारावा.
आज आपण याच्या विरुद्ध दिशेने चालत नाही ना? हा विचार करणे आवश्यक आहे.
“मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय”
बाबासाहेबांचे हे वाक्य हे फक्त उद्गार नाहीत…
ते राष्ट्रीय ओळखीचे अधिष्ठान आहे. आज जात, धर्म, पक्ष, पंथ यांच्या नावावर समाज विखुरतो आहे.
पण बाबासाहेबांनी सांगितलेला मार्ग अगदी स्पष्ट आहे—
भारत प्रथम, बाकी सर्व नंतर.
*महापरिनिर्वाण दिनाचे खरे महत्त्व*
या दिवशी फक्त मेणबत्ती लावणे, फोटोला हार घालणे हा सन्मान नाही.
खरा सन्मान म्हणजे—
त्यांच्या विचारांचे अध्ययन करणे,
संविधानाचे पालन करणे,
अन्यायाविरोधात उभे राहणे,
मानवतेच्या सिद्धांतांना अंगीकारणे,
समतेचे समाजराज्य निर्माण करणे.
आज भारताला प्रगतीच्या दिशेने नेऊ शकणारे विचार म्हणजे—
बाबासाहेबांचे विचार!
कारण त्यात विज्ञानवाद आहे, तर्क आहे, न्याय आहे, आणि सर्वात महत्त्वाचे—मानवता आहे.
*अपेक्षा*:-
महापरिनिर्वाण दिन हा शोकाचा दिवस नाही…
तो जागृतीचा दिवस आहे.
ज्यांच्या कर्तृत्वाने या देशातील कोट्यवधी वंचितांना मानवतेचे प्रकाशपर्व मिळाले, त्या महामानवाला विनम्र अभिवादन.
आणि आपणही आज निश्चय करूया.
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांच्या मार्गाने चालण्याचा…
विवेकाने निर्णय घेण्याचा…
आणि “प्रथम भारतीय” राहण्याचा.
जय भीम!
✒️राहूल डोंगरे(शिवाजी नगर तुमसर,जि.भंडारा)मो:-9423413826














