


✒️संजय नागदेवते(विशेष प्रतिनिधी)मो:-9423415604
नेरी(दि.23जानेवारी):-चिमुर तालुक्यातील नेरी व परिसरात धान शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. धान उत्पादक पट्टा म्हणून या झाडीपट्टीला ओळखले जाते.
मागच्या वर्षी याच महिन्यात ३१०० रु धानाला व्किंटल मागे भाव होता.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधीकचे पैसे लावुन शेतकऱ्यांनी धानाचे पिक घेतले मात्र उत्पन्न खर्चात प्रचंड वाढ आणि आताचा बाजार भाव २७००/- रू यात मोठी तफावत दिसून येत आहे.
त्यामुळे धान उत्पादक शेतकरी हा मरणासन्न अवस्थेतून बाहेर पडणार कधी? असा प्रश्न धान उत्पादक शेतकरी करतांना दिसुन येतात.
हा भाव धान उत्पादक शेतकरयांना परवडणारा नाही!,शेतकऱ्यांना कवडीमोल भावात धान विकावे लागत आहे, त्यामुळे त्यांचा खर्चही निघत नाही.
बँक कडून उचललेल्या कर्जाची परतफेड करायची कशी असा प्रश्न या शेतकऱ्यांपुढे आवासुन उभा आहे.
शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे असे म्हटले जाते, तो राबराब करून शेतीतून उत्पन्न घेतो परंतु त्याला योग्य बाजारपेठ मिळवून दिली जात नाही. त्याला शेतमाल विकायचा राहीला तर दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते याला “विज्ञान युग की अज्ञान युग म्हणावे” हे कळायला मार्ग नाही.
कारखाने चालवणारे वस्तू चे दर स्वतः ठरवतात मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत असे होतांना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जिवनाचा गाडा हाकीत असतो ,”भीक नको घामाचे दाम हवे ” ही शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे.
या मागणीकडे शासनस्तरावरून दुर्लक्ष का केले जाते असे अनेक प्रश्न शेतकरी करतांना दिसुन येतात.
माय बाप सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे व धानाचे भाव वाढवावे अशी मागणी धान उत्पादक शेतकरी करतांना दिसुन येत आहे.














