


(मोर्शी तालुका प्रतिनिधी) : रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेल्या फळ पीकविमा रकमेवर १२.५० टक्के व्याज देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी, गारपिट विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीवर गुन्हे दाखल करून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे, बांगलादेश संत्रा निर्यात अनुदान संत्रा उत्पादक देण्यात यावे यासह आदी मागण्यां संदर्भात शेतकरी कृती समितीतर्फे ३ जानेवारी आयोजित केलेले हिवरखेड येथील चक्काजाम आंदोलन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तूर्तास स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी कृती समितीतर्फे पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून २०२२ – २३ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारीत फळ पीक विमा योजनेमध्ये मोठ्या अपेक्षेने विमा काढून सुद्धा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदत वेळेवर दिल्या जात नसल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी मोर्शी उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन शासनाला व विमा कंपनीला निवेदन देऊन फळ पीक विमा मदत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली असून 3 जानेवारी रोजी हिवरखेड येथे चक्काजाम आंदोलन करण्याचा करण्याचा इशारा शासन व रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीला देण्यात आला होता .
शेतकरी कृती समिती व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याची दखल घेऊन राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटिल यांची भेट घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून केलेल्या अन्याया विरोधात तोडगा काढण्यासाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरावती येथे ४ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ अनिल बोंडे, यांच्या उपस्थितीत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी, संत्रा उत्पादक शेतकरी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केल्यामुळे शेतकरी कृती समिती तर्फे ३ जानेवारी रोजी हीवरखेड येथे होणारे चक्काजाम आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असून या गंभीर विषयांवर तोडगा न निघाल्यास पुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झल्यास त्याला रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व शासन जबाबदार राहणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीतर्फे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राहुल चौधरी, दिनेश घोरमाडे, विनोद ठोके, किशोर जिचकार, पदमाकर नवघरे, शेखर विघे, अंकुश धावडे, शेखर गावंडे, यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.
अमरावती जिल्ह्यामध्ये हवामान आणि भौगोलिक परस्थितीनुसार संत्रा फळांची लागवड हजारो हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात लागवड केल्यामुळे जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे. तेवढ्याच प्रमाणात तोटाही असल्यामुळे पिकांना हवामान धोक्यांपासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल या करीता जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी १२ हजार रुपये भरून २०२२ – २३ मध्ये आंबिया बहार संत्रा फळ पिक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता. मात्र रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून फळ पीक विमा मदत देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून विविध आंदोलनांच्या माध्यमातून टोकाची भूमिका घेतांना दिसत असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय करणार याकडे हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .














