


▪️यशस्वी ४१ विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.1मार्च):-नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून तब्बल ४१ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ही यशस्वी कामगिरी शाळेच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी व प्रेरणादायी ठरली आहे.
या यशानिमित्त शाळेत यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक ए. डब्लू. नाकाडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक पी. आर. जिभकाटे उपस्थित होते. तसेच जेष्ठ शिक्षक वदनलवार सर आणि रतीराम चौधरी सर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
मार्गदर्शनपर भाषणात चौधरी सर यांनी NMMS परीक्षा ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक बळ देणारी असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असे नमूद केले. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत तसेच शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या परीक्षेच्या तयारीसाठी स्कॉलरशिप प्रमुख म्हणून अनुराग देशमुख सर यांनी विशेष जबाबदारी सांभाळली. त्यांना नीता महाजन मॅडम, विलास करंबे सर, शिवानी कुथे मॅडम, माया कापगते मॅडम व कलकोटवार मॅडम यांनी सहकार्य करून विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध व सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन नीता महाजन मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन माया कापगते मॅडम यांनी केले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकजी भैया तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे मनःपूर्वक कौतुक केले.














