Home महाराष्ट्र जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत...

जैन इरिगेशन व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र यांच्यात केळी पिकावरील रोग व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

105

 

जळगाव,(२९ ऑगस्ट) (प्रतिनिधी)- – जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद – राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र (आयसीएआर – एनआरसीबी), तिरुचिरापल्ली यांच्यात केळी पिकावरील फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही (क्युकुम्बर मोजेक व्हायरस) या प्रमुख रोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी नुकताच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे केळीच्या बागेत येणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संशोधन कार्य वाढीस लागेल. या करारावर राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन आणि जैन इरिगेशनच्या टिश्यूकल्चर विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. के. बी. पाटील यांनी स्वाक्षरी केल्या.

करारानंतर बोलताना डॉ. सेल्वराजन म्हणाले, “जैन इरिगेशन गेल्या ३५ वर्षांपासून केळी पिकावर सातत्याने काम करत आहे. कंपनीने टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाद्वारे विषाणूमुक्त (व्हायरस फ्री) रोपे विकसित केली आहेत, ज्यामुळे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास मदत झाली आहे. मात्र, जळगावसह अनेक जिल्ह्यात फ्युजारियम विल्ट आणि सीएमव्ही रोगांचे संकट गेल्या काही वर्षांपासून निर्माण झाले आहे. केळीवरील हे रोग जगभरातील केळी व्यवसाय आणि शेतीला मोठ्या प्रमाणात प्रभावित करताना दिसत आहेत. ही बाब लक्षात घेऊन पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) प्रकल्पा अंतर्गत हा करार करून यावरील संशोधनास चालना देण्यात आली आहे. या सहकार्य करारामुळे आम्हाला एकत्रितपणे रोग नियंत्रणाच्या नवीन पद्धती विकसित करण्यास चालना मिळेल.

जैन इरिगेशनने शास्त्रीय आणि तांत्रिकदृष्ट्या जागतिक पातळीवर कार्य केले आहे. त्याच प्रमाणे शेती, पाणी आणि पर्यावरणासंदर्भात जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांचे कार्य सर्वश्रृत आहे. त्यांच्या दूरदृष्टीने साकारलेले टिश्युकल्चर तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन व गुणवत्तावाढी बरोबरच केळी फळाच्या निर्यातीला विशेष चालना मिळाली आहे.

या करारा अंतर्गत होणाऱ्या संशोधनातून केळी उत्पादक शेतकऱ्यांना फ्यूजारियम विल्ट व सिएमव्ही सारख्या घातक रोगांचे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. यामुळे जळगाव सह महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळीवरील रोगांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकेल. या संशोधन कार्य मधे केळी उत्पादकाच्या शेतावर सुद्धा संशोधन करता येईल.त्यामुळे शेतकऱ्यांचा रोग नियंत्रणावरील खर्च कमी होवून उत्पादन वाढीबरोबरच आर्थिक स्थैर्य मिळेल. या करार प्रसंगी ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. पी. गोविंदराज व जैन इरिगेशनचे डॉ. अनिल पाटील आणि डॉ. एस. नारायणन उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here