


आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील (आयएसएस ) १८ दिवसांच्या वास्तवानंतर आणि २२.५ तासांच्या प्रवासानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऑक्सिऑम ४ मोहिमेतील आपल्या तीन सहकाऱ्यांसह मंगळवारी पृथ्वीवर सुरक्षित परतले आणि इतिहास घडला. शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतताच त्याच्या कुटुंबासह संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतण्याचा क्षण देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. शुभांशू शुक्ला आपली मोहीम फत्ते करून पृथ्वीवर परत आले हा क्षण १४० कोटी भारतीयांनी आपल्या मनात साठवून ठेवला. शुभांशू शुक्ला सुरक्षित परत आल्याने १४४ कोटी भारतीयांना ‘ अंतराळ ठेंगणे झाले’ असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शुभांशू हे भारताचे दुसरेच अंतराळवीर आहेत. या आधी विंग कमांडर राकेश शर्मा यांनी ४१ वर्षापूर्वी अंतराळाला गवसणी घातली होती त्यानंतर आता तशी कामगिरी करणारा शुभांशू हा पहिलाच आणि देशातील केवळ दुसरा अंतराळवीर ठरला आहे.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला २५ जून रोजी ऑक्सिऑम मिशन ४ अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले होते. शुभांशू शुक्ला हे या मोहिमेचे पायलट होते. भारतीय वेळेनुसार दुपारी २५ जून रोजी दुपारी १२ वाजता फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरवरून हे मिशन लाँच करण्यात आले होते . सर्व अंतराळवीरांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटशी जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये उड्डाण केले. ड्रॅगन अंतराळयान २६ जून रोजी दुपारी ४.३० वाजता सुमारे २८.५ तासांनंतर आयएसएसशी जोडले गेले
अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय एजन्सी इस्रो यांच्यातील करारानुसार, भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती.
मोहिमेचे उद्दिष्ट
ऑक्सिऑम ४ या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट अंतराळात संशोधन करणे आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे हे होते. हे अभियान खाजगी अंतराळ प्रवासाला प्रोत्साहन देणारे देखील होते आणि भविष्यात व्यावसायिक अंतराळ स्थानक ( ऑक्सिऑम स्टेशन) बांधण्याची योजना असलेल्या ऑक्शन स्पेस प्लॅनिंगचा एक भाग होता.
वैज्ञानिक प्रयोग: सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध प्रयोग करणे.
तंत्रज्ञान चाचणी: अवकाशात नवीन तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास.
आंतरराष्ट्रीय सहकार्य: विविध देशांतील अंतराळवीरांना व्यासपीठ प्रदान करणे.
शैक्षणिक उपक्रम: अवकाशातून पृथ्वीवरील लोकांना प्रेरणा देणे आणि जागरूकता पसरवणे.
++++++++
शुभांशू शुक्ला कोण आहेत ?
शुभांशू यांचा जन्म १९८६ मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाला. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून शिक्षण घेतले. ते २००६ मध्ये हवाई दलात सामील झाले आणि लढाऊ विमाने उडवण्याचा अनुभव आहे. त्यांची निवड इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीही झाली आहे, जी भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. अंतराळवीर होण्यासाठी त्यांनी रशिया आणि अमेरिकेत विशेष प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, आपत्कालीन हाताळणी आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये काम करायला शिकले.
शुभांशू शुक्ला यांनी आयएसएसवर काय केले ?
शुभांशू १४ दिवस तिथे राहिले आणि त्यांनी ७ प्रयोग केले, जे भारतीय शैक्षणिक संस्थांनी तयार केले आहेत. यापैकी बहुतेक जैविक अभ्यास आहेत, जसे की अंतराळातील मानवी आरोग्यावर आणि जीवांवर होणारा परिणाम पाहणे. याशिवाय, त्यांनी नासासोबत आणखी ५ प्रयोग केले, जे दीर्घ अंतराळ मोहिमांसाठी डेटा गोळा करणारे आहेत. या मोहिमेत केलेले प्रयोग भारताच्या गगनयान मोहिमेला बळकटी देणारे ठरतील. शुभांशूचा हा अनुभव २०२७ साली नियोजित असलेल्या गगनयान मोहिमेसाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी आणलेला डेटा आणि अनुभव भारताच्या अंतराळ कार्यक्रमास पुढे नेण्यास मदत करू शकेल.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे














