


✒️तालुका प्रतिनिधी(किशोर राऊत)मो:-9011649037
महागांव(दि.7मार्च):- – भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा जगाचा पोशिंदा बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आला आहे. सलग दोन – तीन वर्षांपासून शेतकरी दुष्काळाच्या छायेत आपले जीवन जगत आहे. आपल्या जवळील जमापुंजी गोळा करून शेतात भर उन्हात जिवाचं रान करून मेहनत घेतली परंतु कधी अत्यल्प पावसाने तर कधी अती पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे.
आता रब्बी हंगामातील खर्चाच्या ताणाने शेतकऱ्यांवर उधारी उसनवारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यात आता ढगाळ वातावरणामुळे पुन्हा बळीराजा हतबल झाला आहे. कारण शेतातील सोंगून ठेवलेला हरभरा व गहू घरापर्यंत सुरक्षित जाईल की नाही याची ढगाळ वातावरणामुळे शाश्वती नाही. त्यामुळे बळीराजाच्या स्वप्नांची राखरांगोळी तर होणार नाही? याची चिंता बळीराजाला भेडसावत आहे. शेतकऱ्यांजवळील सर्व पुंजी खर्च झाली असून उधारी, उसनवारी करून जगाच्या पोशिंद्याला शेती करावी लागत आहे. त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे आता ढगाळ वातावरणामुळे सोंगुन ठेवलेल्या पिकांवर सुद्धा फार मोठे संकट कोसळण्याचे संकेत दिसत
आहे. त्यामुळे बळीराजा धास्तावला
आहे.
……..
गहू, हरभरा पिकाची धास्ती !
शनिवार (ता.४) पासूनच ढगाळ वातावरणामुळे बळीराजा शेतातील गहू, हरभरा जमा करण्यासाठी धावपळ करतांना दिसत आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम सुद्धा दुष्काळाच्या छायेत जाण्याची चिंता अनेक शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या डोक्यावर चिंतेचे ढगच दाटले असून पिकांची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे.- अविनाश आनंदराव नरवाडे, शेतकरी, महागांव.













