


✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)8698566515
गंगाखेड(दि.9जून):-मौजे बनपिंपळ (ता. गंगाखेड) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, याबाबत गटविकास अधिकारी गंगाखेड यांच्याकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, दि. ३१ मे २०२६ रोजी येणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असूनही ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाकडून कोणताही अधिकृत कार्यक्रम, अभिवादन अथवा उपक्रम राबविण्यात आला नाही. ही बाब सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेचा अभाव दर्शवणारी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सदर निवेदनावरकिशन अनुरथ व्होरे,विकास सदाशिव कोरके, गुंडीबा सोनेराव कोरके, अर्जुन वैजेनाथ कोरके, गोविंदराव शिवाजी खडके,व्य़कट मधुकरराव मुलगिर यांच्या स्वाक्षऱ्या असून, त्यांनी प्रशासनाच्या या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
अहिल्यादेवी होळकर या केवळ एका समाजाच्या नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आराध्य दैवतासमान व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या जयंतीकडे दुर्लक्ष होणे म्हणजे सामाजिक समतेच्या आणि सांस्कृतिक परंपरेच्या मूल्यांवर आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापुढे अशा प्रकारचा विसर पडू नये, सर्व थोर महापुरुषांच्या जयंती नियोजनपूर्वक व शासकीय मान्यतेने साजऱ्या करण्यात याव्यात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी परभणी, उपविभागीय अधिकारी गंगाखेड व उपकार्यकारी अधिकारी परभणी यांनाही पाठविण्यात आल्या असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.















