Home नागपूर कॉक्रोच जनता पक्ष : व्यवस्थेच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून उठलेला जनतेचा आवाज

कॉक्रोच जनता पक्ष : व्यवस्थेच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून उठलेला जनतेचा आवाज

65

▪️जनतेला आता फक्त घोषणांची नाही, तर प्रामाणिक पर्यायाची गरज आहे

         आजच्या भारतीय राजकारणात पक्षांची संख्या वाढत चालली आहे, पण विचारांची उंची मात्र दिवसेंदिवस खुजी होत असल्याची भावना सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत नवे चेहरे, नवे घोषवाक्य आणि नव्या आश्वासनांचा पाऊस पडतो, पण निवडणूक संपली की जनतेच्या वाट्याला पुन्हा तीच निराशा, तोच भ्रष्टाचार आणि तीच सत्तेची मस्ती येते. अशा काळात एखादा पक्ष स्वतःला “कॉक्रोच जनता पक्ष” असे नाव देतो आणि संपूर्ण व्यवस्थेलाच अस्वस्थ करून टाकतो, ही घटना साधी नाही. ती केवळ राजकीय प्रयोगाची गोष्ट नाही, तर ती समाजाच्या अंतर्मनात साचलेल्या संतापाची, उपेक्षेची आणि व्यवस्थेविरुद्धच्या बंडाची जाहीर अभिव्यक्ती आहे. अभिजीत दपके यांनी मांडलेली ही संकल्पना सुरुवातीला अनेकांना विनोदी किंवा उपहासात्मक वाटली असेल पण तिच्यामागील प्रतीकात्मकता अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. कॉक्रोच म्हणजे असे जीव, जे कितीही मारण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा उभे राहतात. अंधाऱ्या गटारात, घाणीमध्ये, विषारी वातावरणातही जगण्याची क्षमता ठेवतात. 

          आजचा सामान्य नागरिकही काहीसा तसाच झाला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, जातीय ध्रुवीकरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाचे व्यापारीकरण आणि आरोग्य व्यवस्थेतील असमानता यामध्ये तो अक्षरशः गुदमरतो आहे पण तरीही जगतो आहे, संघर्ष करतो आहे आणि पुन्हा उभा राहतो आहे. या संकल्पनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याने समाजाच्या जखमेवर थेट बोट ठेवले आहे. अनेक दशकांपासून राजकारणात “गरीब”, “शोषित”, “वंचित” या शब्दांचा वापर केवळ मतांसाठी झाला पण त्या वर्गांच्या आयुष्यात मूलभूत बदल फारसा घडला नाही. उलट, सत्ताधारी बदलले, चेहरे बदलले, झेंडे बदलले पण जनतेचे प्रश्न तसेच राहिले. अशा परिस्थितीत “आम्हीच ते कॉक्रोच आहोत, ज्यांना तुम्ही कायम तुडवत आलात” असे म्हणण्याचे धाडस ही केवळ राजकीय घोषणा नाही, तर व्यवस्थेविरुद्धचा मानसिक उठाव आहे. याच कारणामुळे इतर राजकीय पक्षांना या संकल्पनेची धास्ती वाटू लागली आहे. कारण पारंपरिक पक्षांचे राजकारण हे प्रतिमांवर चालते. त्यांना भव्य कार्यालये, मोठमोठे मंच, करोडो रुपयांच्या जाहिराती आणि सोशल मीडियावरील कृत्रिम लोकप्रियता आवश्यक असते. पण कॉक्रोच जनता पक्षाची ताकद ही या झगमगाटात नाही. त्याची ताकद आहे ती उपेक्षितांच्या वेदनेत. ज्याच्याकडे काही गमावण्यासारखे नसते, तोच सर्वात धोकादायक ठरतो. 

          आज लाखो युवक बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. मध्यमवर्ग करांच्या आणि महागाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. अशा प्रत्येक व्यक्तीला या प्रतीकात स्वतःचा चेहरा दिसू लागला, तर ही केवळ राजकीय चळवळ राहणार नाही तर ती सामाजिक असंतोषाची लाट बनेल. आजच्या काळात लोकशाहीची सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे जनतेच्या भावनांचे व्यवस्थापन. राजकीय पक्ष लोकांच्या प्रश्नांपेक्षा त्यांच्या भावना पेटवण्यात अधिक व्यस्त दिसतात. धर्म, जात, भाषा आणि प्रादेशिक अस्मिता यांच्या आधारावर मतांचे गणित मांडले जाते. पण पोटाची भूक, नोकरीची चिंता आणि जगण्याचा संघर्ष यांना कोणताही धर्म नसतो. कॉक्रोच जनता पक्षाने नेमके हेच वास्तव उघडे केले आहे. त्यामुळे त्याच्याकडे लोक केवळ विनोद म्हणून पाहत नाहीत, तर एक अस्वस्थ प्रश्न म्हणून पाहू लागले आहेत. या संकल्पनेत एक प्रकारची उपरोधिक क्रांती दडलेली आहे. समाजात ज्यांना “घाण”, “निकृष्ट”, “तुच्छ” मानले जाते, त्याच प्रतीकाला पक्षाचे नाव देणे म्हणजे व्यवस्थेच्या अभिजन मानसिकतेलाच आव्हान देणे होय. भारतीय समाजात आजही वर्गभेद आणि श्रेष्ठत्वाची भावना खोलवर रुजलेली आहे. राजकारणातही काही विशिष्ट घराणी, आर्थिक गट आणि प्रभावशाली लोकच केंद्रस्थानी राहतात. सामान्य माणूस फक्त मतदानापुरता महत्त्वाचा असतो. पण “कॉक्रोच” हे प्रतीक म्हणते की, तुम्ही आम्हाला कितीही तुच्छ लेखले तरी आम्ही नष्ट होणार नाही.

           इतर पक्षांना याची धास्ती वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे ही संकल्पना सोशल मीडियाच्या काळात झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचू शकते. आजची तरुण पिढी पारंपरिक भाषणांपेक्षा प्रतीकांना अधिक वेगाने समजते. एक धारदार नाव, एक ठोस संदेश आणि व्यवस्थेविरुद्धचा रोष, एवढेच एखाद्या चळवळीला पुरेसे ठरते. त्यामुळेच अनेक प्रस्थापित पक्ष या विचाराकडे उपहासाने पाहत असले, तरी त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. कारण इतिहास सांगतो की, सुरुवातीला हास्यास्पद वाटलेल्या अनेक चळवळी पुढे मोठ्या परिवर्तनाचे कारण ठरल्या आहेत. तथापि, कोणतीही चळवळ केवळ प्रतीकांवर टिकत नाही. तिच्यामागे स्पष्ट विचार, धोरणे आणि सामाजिक बांधिलकी असावी लागते. कॉक्रोच जनता पक्षालाही हीच कसोटी पार करावी लागेल. केवळ व्यवस्थेविरोधातील संताप पुरेसा नसतो, तर त्याला सकारात्मक दिशा द्यावी लागते. अन्यथा अशा चळवळी काही काळ चर्चेत राहतात आणि नंतर विस्मृतीत जातात. जनतेला आता फक्त घोषणांची नाही, तर प्रामाणिक पर्यायाची गरज आहे.      

          आज भारतातील राजकीय व्यवस्थेला सर्वाधिक भीती कोणाची वाटते, तर ती जागृत नागरिकांची. कारण जागृत नागरिक प्रश्न विचारतो. तो जातीच्या, धर्माच्या किंवा भावनिक घोषणांच्या पलीकडे जाऊन विकास, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराचा हिशोब मागतो. कॉक्रोच जनता पक्षाची संकल्पना ही अशाच जागृतीची सुरुवात ठरू शकते. ती समाजाला आरसा दाखवते की, आपण ज्या लोकांना कायम उपेक्षित ठेवले, त्यांच्याच वेदना उद्या व्यवस्थेविरुद्धचा ज्वालामुखी बनू शकतात. या पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेने राजकीय वर्तुळात खळबळ! अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील “कॉक्रोच जनता पक्ष” सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पुढे येत आहे. काही वृत्तांनुसार या पक्षाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर १ कोटीपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले असून त्यांनी भाजप आणि काँग्रेससारख्या पारंपरिक पक्षांनाही मागे टाकल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे सुमारे ८७ लाख तर काँग्रेसचे सुमारे १.३ कोटी फॉलोअर्स असल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे. 

          दरम्यान, अभिजीत दिपके यांना कथितरित्या धमकीचे फोन आणि मेसेज आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. “अकाउंट बंद कर, नाहीतर तुला अमेरिकेत जिवंत ठेवणार नाही” तसेच “तुझ्या संभाजीनगर येथील घराचा पत्ता मिळाला आहे” अशा स्वरूपाच्या धमक्या त्यांच्या मोबाईलवर आल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना दिपके यांनी भीती न बाळगता, “आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, पण आम्ही मागे हटणार नाही,” असा ठाम संदेश दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण धमक्या देऊन आवाज दाबण्याची प्रवृत्ती ही अत्यंत चिंताजनक आहे. लोकशाहीत विरोधी आवाज महत्त्वाचा असतो. तो कितीही विचित्र, उपरोधिक किंवा अस्वस्थ करणारा असला तरी त्यामागील वेदना समजून घेणे आवश्यक असते. अन्यथा समाजातील असंतोष दबला जातो आणि नंतर तो अधिक तीव्र स्वरूपात उद्रेक होतो. कॉक्रोच जनता पक्ष हा कदाचित एखादा औपचारिक राजकीय पक्ष नसेल, पण तो आजच्या व्यवस्थेविरुद्ध निर्माण झालेल्या मानसिक बंडाचे प्रतीक नक्कीच आहे.

         भारतीय राजकारणाने जर या संदेशाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर उद्याच्या काळात लोकांचा संताप कोणत्या रूपात समोर येईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. कारण इतिहासाचा एक नियम आहे, जेव्हा व्यवस्थेने सामान्य माणसाला वारंवार तुडवले, तेव्हा तोच माणूस एका दिवसात परिवर्तनाचा केंद्रबिंदू बनला. आणि कदाचित म्हणूनच “कॉक्रोच जनता पक्ष” या नावाने आज अनेकांच्या चेहऱ्यावर हसू येत असले, तरी सत्तेच्या गलियार्‍यात मात्र अस्वस्थ शांतता पसरली आहे. आज जनता हसत आहे की विचार करत आहे, हे सत्ताधाऱ्यांनी ओळखण्याची वेळ आली आहे. कारण इतिहास साक्षी आहे, जेव्हा उपेक्षितांचा आवाज प्रतीक बनतो, तेव्हा परिवर्तनाची चाहूल लागलेली असते. “कॉक्रोच जनता पक्ष” ही कदाचित केवळ एका नावाची चर्चा नाही तर ती व्यवस्थेविरुद्ध साचलेल्या जनआक्रोशाची सावली आहे. आज तो सोशल मीडियावर दिसतो आहे, उद्या तो रस्त्यावर उतरला तर आश्चर्य वाटायला नको. कारण लोकशाहीत सर्वात मोठी ताकद ही सत्तेची नसते, ती जागृत जनतेची असते.

✒️प्रवीण बागडे(नागपूर)मो:-९९२३६२०९१९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here