


✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.23मार्च):- शनिवार २२ मार्च रोजी दुपारी तीन वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगाखेड येथे आमदार.l डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. या वेळी सर्व समाज बांधवानी आपआपले सण उत्सव शांततेत साजरे करावे असे आवाहन करण्यात आले.
सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे शुक्रवार रोजी रात्री दोन गटातील तरुणांत वादाची घटना घडल्याने शहरातील वातावरण शांत राहण्याचे अनुषंगाने तसेच येणारे उत्सव गुडी पाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २२ मार्च रोजी दुपारी ३ वाजता गंगाखेड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे, परिविक्षाधीन भा.पो.से. अधिकारी ऋषीकेश शिदे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, सपोनि सिद्धार्थ इंगळे आदींची उपस्थिती होती. चुकीच्या पोस्ट टाकून समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने तो कोण आहे.
कुठल्या पक्षाचा वा कुठल्या समाजाचा आहे हे न पाहता अशा समाज विघातक प्रवृत्ती विरुद्ध कठोर कारवाही करावी असे आवाहन आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केले तर आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही वा त्यांची गय करणार नसल्याचा इशारा देत तरुण युवा वर्गाला चुकीच्या मार्गांवर जाण्यापासून रोखावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी आपल्या प्रस्ताविकात केले. ऐतिहासिक वारसा असलेले गंगाखेड शांतता प्रिय शहर असुन शहराच्या शांततेत बाधा आणणाऱ्या समाज कंटकाची पोलीस प्रशासन गय करणार नाही. सर्व जाती धर्मातील समाज बांधवानी आप आपले सण उत्सव शांततेत साजरे करावे. सोशल मीडियावरील बहुतांश आयडी चुकीच्या असल्याने अशा चुकीच्या आयडीला लाईक किंवा पोस्ट शेअर करू नये. कोणी आक्षेपार्ह पोस्ट ठेवली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन गंगाखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन स.पो.अ. ऋषिकेश शिंदे यांनी केले. तर समाजातील शांतता बिघडविणाऱ्या समाज कंटकावर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासन खंबीर असल्याचे सांगत कुठे काही झाल्याचा परिणाम आपल्या शहरावर होऊ देऊ नका असे आवाहन उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी केले. मोबाईल हे अत्यंत घातक शस्त्र असल्यामुळे सोशल मीडियावरील पोस्टची खात्री केल्याशिवाय ती व्हायरल करू नये. सोशल मीडिया वापरतांना खबरदारी घ्यावी.
समाज मन बिघडवणारी अनुचित पोस्ट व्हायरल करणे टाळावे व प्रत्येक सण आनंदाने साजरा करावा असे म्हणतं सोशल मीडिया वापरा संदर्भात समिती स्थापन करण्याच्या उद्देशाने आमदार महोदयांनी शासनाकडे पाठपुरावा करावा अशी विंनती अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी यावेळी उपस्थित आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांना केली व शहरातील शांततेला गाल बोट लागणार नाही याची काळजी सर्व पक्षीय पदाधिकारी, शांतता समिती सदस्यांनी घ्यावी असे आवाहन ही अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांनी केले. या बैठकीचे सूत्रसंचालन बाळासाहेब राखे यांनी केले तर आभार सपोनि सिद्धार्थ इंगळे यांनी मानले.














