Home महाराष्ट्र माता रमाई यांनी दुःखाचा डोंगर सहन केला : जयसिंग वाघ

माता रमाई यांनी दुःखाचा डोंगर सहन केला : जयसिंग वाघ

209

जळगाव :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांना फक्त सदतीस वर्षाचे आयुष्य लाभले मात्र या सदतीस वर्षात त्यांना आई , वडील , सासरे , जेठ , सावत्र सासू , स्वतःची तीन मुलं व एका मुलीचे निधन बघावे लागले , एकुलता एक मुलगा राहिला मात्र तोही सारखा आजारी पाहावा लागला व पुढं त्या स्वतः तीन वर्षे आजारी राहिल्या या वरून त्यांच्या जीवनात जणू दुःखाचा डोंगरच उभा होता मात्र त्या थोड्याही विचलित झाल्या नाही , मरताना सुध्दा बाबासाहेबांना त्या सामाजिक कार्य पुढं चालू ठेवण्याचा आग्रह करतात असे वीचार प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले .
जिजाऊ नगर येथील सम्राट अशोक ध्यानसाधना केंद्र , जळगाव येथे भीम कन्या महिला मंडळ व सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे रमाई जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की रमाईंनी अपार कष्ट सहन केले , अपार दुःख सहन केले , आपले कष्ट , आपले दुःख त्यांनी प्रसंगी बाबासाहेबांना सुध्दा सांगितले नाही हे जरी खरे असले तरी काही लोक ते अत्यंत रंजक स्वरूपात मांडून ते एक प्रकारे बाबासाहेबांची व रमाईंची बदनामीच करतात हे मात्र स्वागतार्ह नाही . रमाई यांनी अपवादाने शेणगौऱ्या केल्या आहेत , काही प्रसंगी त्या दोन दोन दिवस उपाशी राहिलेल्या आहेत , फाटक्या कपड्यात राहिल्या आहेत मात्र याचा अर्थ हा नाही की त्या आयुष्यभर तश्याच राहिल्या . त्यांच्याकडं सोन्याचे दागिने खूप होते , बाबासाहेब खूपदा त्यांच्याकड पैसे एवढे देत असत की ते रमाईंना मोजता येत नव्हते . त्याकाळी बाबासाहेब हिंदू कॉलनीत दोन प्लॉट विकत घेतात , दोन मोठे बंगले बांधतात .या कामी त्यांना सुमारे सात ते आठ लाख रुपये खर्च येतो हे आपण समजून घ्यावे असेही वाघ यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक विनोद सपकाळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की , रमाई यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत सहभाग घेतला असून त्यांनी घरीच शिक्षण घेतले .त्यांना वाचनात गोडी होती .
बापू साळुंके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , रमाईंची महती आता सर्वांना कळू लागली आहे , सर्व जाती , धर्माची माणसे त्यांची जयंतीच साजरी करीत नाही तर त्यांचा आदर्श सांगतात ही अभिमानाची बाब आहे.
सुरवातीस बुद्ध पूजा करून बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्या नंतर शीतल मसाने यांनी रमाईवर एकपात्री नाटिका सादर केली , ज्योती साळुंके , ज्योती सूरदास यांनी मनोगत व्यक्त केले . सूत्रंसंचालन माधुरी वाघ तर आभार माधुरी साळुंके यांनी केले .
विशाखा हनुवते, साधना बाविस्कर , उषा सपकाळे , सुरेखा भालेराव , ज्योती गाढे , स्वाती मेढे , संगीता सपकाळे , आम्रपाली मोरे , ज्योती लोखंडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले कार्यक्रमास श्रोते मोठ्यासंख्येने हजर होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here