


_विभाजन भय स्मरण दिवस, जो १४ ऑगस्ट रोजी असतो, हा दिवस १९४७ साली भारत-पाकिस्तान विभाजनाच्या काळातील भयावहतेचे स्मरण करण्यासाठी समर्पित आहे. या दिवसाचा उद्देश विभाजनाच्या वेळी झालेल्या अत्याचारांची, हिंसेची, आणि विस्थापनाची आठवण करून देतो. लाखो लोकांना आपले घर, आपली जमीन, आणि आपले कुटुंब गमवावे लागले. या विभाजनामुळे भारताच्या इतिहासात एक काळा अध्याय लिहिला गेला. श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजींचा सदर माहितीपूर्ण लेख… संपादक._
या दिवशी त्यावेळच्या भीषणतेने त्रस्त झालेल्या लोकांची आठवण करून त्यांचे दुःख आणि वेदना समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून, देशातील नवीन पिढ्यांना त्या विभाजनातून शिकवण घेत एकता आणि शांततेच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्व पटवले जाते. विभाजन भय स्मरण दिवस हा इतिहासातील त्रासदायक घटना विसरू नये म्हणून आणि भविष्यकाळात अशा भयावहतेची पुनरावृत्ती होऊ नये याची जाणीव ठेवण्यासाठी साजरा केला जातो.
भारत व पाकिस्तान या दोन देशांची निर्मिती करणारी ही ऐतिहासिक घटना होती. अखंड भारताची फाळणी होऊन दि.१४ ऑगस्ट १९४७ रोजी पाकिस्तान व १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत हे दोन देश अस्तित्वात आले. सन १९४७ साली ब्रिटिश साम्राज्याचा भारतीय उपखंड तीन- पुढे चार राष्ट्रांत विभाजित झाला. यात आजचा भारत, ब्रह्मदेश- म्यानमार, श्रीलंका व पाकिस्तान- पूर्व पाकिस्तान व आजचा बांग्लादेश आदींचा समावेश होता.
फाळणीचे बीज स्वातंत्र्याच्या बरेच आधी रोवले गेले. स्वातंतत्र्यपूर्व अखंड भारतात हिंदू बहुसंख्य होते. तत्कालीन राजकीय परिस्थितीत भारतीय राष्ट्रीय कॉन्ग्रेस मोठी राजकीय संस्था होती. ही संस्था मुसलमानांचे हितसंबध राखण्यास असमर्थ आहे, असे मानून १९०६ साली ढाका शहरात अखिल भारतीय मुस्लिम लीग पक्षाची अल्लामा इक्बाल यांनी स्थापना केली. हिंदू व मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्रसमूह असून असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धान्त महंमद अली जीना यांनी मांडला. ही राष्ट्रे वेगळी झाली, तरी अमेरिका-कॅनडाप्रमाणे यांचे हितसंबंध परस्पर-जडित असतील असा युक्तिवाद त्यांनी केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांचा या सिद्धान्तास विरोध होता. आपला द्विराष्ट्रसिद्धान्त पुढे रेटण्यासाठी त्यांनी ऑगस्ट १९४६ साली कलकत्त्यात थेट कृतिदिनाचे आवाहन केले. यात सुमारे ५,००० लोक ठार झाले.
प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया मांउटबॅटन योजनेखाली पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. दि.१८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला. यात भारतातील ५६५ संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली. या तरतुदीमुळे काश्मीर समस्येचा उदय झाला. फाळणीनंतरच्या काळात लोकसंख्येचे प्रचंड प्रमाणात स्थलांतर झाले. सुमारे १.४५ कोटी लोकसंख्या फाळणीने प्रभावित झाली. फाळणीनंतर उफाळलेल्या दंगलीत एकूण १० लाख लोकांना प्राण गमवावे लागल्याचा अंदाज आहे. फाळणीनंतरही देशातील एकूण मुसलमानांपैकी १/३ मुसलमान आजच्या भारतात राहिले. फाळणीला गांधीजीनी मान्यता दिली होती.
हिंदू-मुस्लिम हिंसाचार ही फाळणीची परिणती होती. याशिवाय फाळणीचे अनेक पडसाद नंतरच्या काळात उमटत राहिले. नवनिर्मित पाकिस्तानची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर सन १९५२ साली पाकिस्तानात वाद उफाळला.
पाकिस्तानच्या पूर्व व पश्चिम विभागातील तेढ वाढून सन १९७१ साली बांग्लादेश उदयाला आला.
भारतात स्वातंत्र्योत्तर काळातही हिंदू-मुस्लिमांत भीषण दंगे घडले. भारत व पाकिस्तानमध्ये चारदा युद्ध झाले. जम्मू व काश्मीरमधील फुटीरतावाद व पाकिस्तान प्रक्षोभित उग्रवाद जन्माला आले. ईशान्य भारतामधील फुटीर चळवळी
उर्दू भाषिकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे जन्माला आलेले मुहाजिर आंदोलन होय.
!! नवनिर्मित सर्व राष्ट्रांना विश्वबंधुत्व व विश्वशांती संबंधी शुभकामना !!
– संकलन व शब्दांकन –
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
(मानव एकता, विश्वबंधुत्व आणि विश्वशांती यांची कामनाकर्ता.)
प.पू.गुरूदेव हरदेव कृपानिवास,
रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.














