Home महाराष्ट्र …आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची वर्गखोली !

…आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची वर्गखोली !

340

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :-जिल्हा परिषद प्रशालेत वर्ग खोली अभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. खोली ऊपलब्ध असूनही तहसील प्रशसानाने आपले साहित्य येथे ठेवल्याने विद्यार्थ्यांना चक्क झाडाखाली बसून ज्ञानार्जन करावे लागत होते. शाळेच्या मुख्याध्यापकांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा करून एकाच दिवसात वर्गखोली रिकामी करून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर झाली असून मुख्याध्यापकांसह, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

गंगाखेड येथील जिल्हा परिषद प्रशालेत ईयत्ता नववी व दहावी चे वर्ग भरतात. माध्यमिक शाळेसाठी येथे सहा वर्ग खोल्या ऊपलब्धही आहेत. परंतू यातील तीन खोल्या गृहरक्षक दलासाठी देण्यात आल्या. उर्वरीत तीन खोल्यांमध्ये नववी व दहावीचे वर्ग भरवले जात. त्यातील एका वर्गखोलीत सुसज्ज अशी प्रयोगशाळा असल्याने दोन खोल्यांमधून वर्ग घेतले जात होते. त्यातच मागील काही महिण्यांपासून तहसीलच्या निवडणूक विभागाने आपली काही कागदपत्रे एका वर्ग खोलीत आणून टाकत या खोलीवर ताबा केला. यामुळे बऱ्याचदा दोन्ही वर्ग एकाच खोलीत तर कधी एक वर्ग झाडाखाली भरवण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली होती. शाळेकडून वारंवार मागणी करूनही त्यांची दखल घेतली जात नव्हती.

ही बाब शाळेचे मुख्याध्यापक श्री बी. एस. ठुले यांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या निदर्शनास आणून देत वर्ग खोली विद्यार्थ्यांसाठी ऊपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावरून गोविंद यादव यांनी काल दिनांक २४ जून रोजी सकाळी शाळेस भेट दिली. परिस्थितीचे गांभीर्य समजून घेत गंगाखेड तहसीलच्या निवडणूक विभागाशी संपर्क साधला. निवडणूक विभगाचे नायब तहसीलदार श्री अशोक केंद्रे, विभाग प्रमुख श्री रईफ अन्सारी यांनी विद्यार्थ्यांसाठीचे या वर्गखोलीचे महत्व समजून घेत एकाच दिवसात हे साहित्य इतरत्र हलवले. यामुळे आता ऊद्यापासूनच नववी व दहावीचे वर्ग स्वत्रंत भरवले जाणार असून विद्यार्थ्यांना झाडाचाही आसरा घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. यावरून शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले असून गोविंद यादव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे.
*जिल्हा परिषद शाळा ही खऱ्या गरजवंतांची गरज – गोविंद यादव*
जिल्हा परिषद शाळांमधून खरे गरजवंत विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शासन या शाळांना सर्व सोयी सुविधा पुरवत असते. मुख्याध्यापक श्री ठुले आणि त्यांचे सर्व सहकारीही ज्ञानार्जनाचे कार्य प्रामाणिकपणे करत असताना प्रशासनाकडून होणारी अशी गैरसोय योग्य नाही. तहसील प्रशासनाने ही गैरसोय तातडीने दूर करून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केल्याचे समाधान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here