🔸नवनिर्वाचित कारभाऱ्यांचा सत्कार : सुप्रसिध्द वक्ते संदीप माटेगावकर यांचा प्रवेश
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.2जानेवारी):- राजकारणाच्या पलीकडे जाऊन जनतेची सेवा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत: आ.डॉ.गुट्टे काका मित्रमंडळाची स्थापना केली आहे. त्यामुळे स्थापनेपासून आजपर्यत मित्रमंडळाने अनेक सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. तसेच पुढेही जनतेच्या कल्याणासाठी मित्रमंडळ काम करणार आहे. लोकांच्या अडचणी व प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी मित्रमंडळ हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मित्रमंडळात राहून जनतेची प्रामाणिकपणे सेवा करा, असा कानमंत्र गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिला.
आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शहरातील जुना मोंढा येथील राजाराम सभागृहात आयोजित नवनिर्वाचित सरपंच व सदस्य सत्कार आणि प्रसिध्द वक्ते संदीप माटेगावकर यांच्या प्रवेश सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेशराव दादा रोकडे, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, पालम प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, तालुकाध्यक्ष रामप्रसाद सातपुते, गणेश कदम, संदीप माटेगावकर आणि डॉ.नामदेव दळवी होते.
पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, मित्रमंडळाची स्थापना सामाजिक बांधिलकीतून झाली आहे. त्यामुळे आपल्या कामाचे केंद्र सामान्य जनता आहे. म्हणून मित्रमंडळाने नेहमी सामाजिकता जोपासली आहे. विविध क्षेत्रातल्या समस्या दूर करण्यासाठी आपले सर्व पदधिकारी तत्पर असतात. हाच वसा आणि वारसा भविष्यात सुध्दा आपल्याला कायम ठेवायचा आहे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती किंवा महत्वकांक्षा मनात बाळगून मित्रमंडळात येऊ इच्छित असणाऱ्यांना आपण प्रवेश देत नाही. मात्र, सामाजिक कार्यासाठी मित्रमंडळात येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे जनकल्याण आणि जनविकास या संकल्पना अधिक घट्ट करण्यासाठी मित्रमंडळात प्रवेश करा. लोकांचा संपर्क वाढवा. त्यांच्या सुख-दु:खात साथ द्या. त्यांना आपुलकीने बोला. त्यांच्याशी प्रेमाने बोला. तरच आपला हेतू यशस्वी होईल.
याप्रसंगी समर्थक नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा तसेच मित्रमंडळात नुकताच प्रवेश केलेले सुप्रसिध्द वक्ते संदीप माटेगावकर यांचाही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे औचित्य साधून रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, प्रभारी माधवराव गायकवाड, डॉ.नामदेव माळी आणि संदीप माटेगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कदम व सूत्रसंचालन रत्नाकर सुर्यवंशी यांनी केले. तर आभार लक्ष्मण रेनकापूरकर यांनी मानले.
यावेळी हनुमान अग्रवाल, विजय कराड, दाजीबा भोसले, सुनिल डुबेवार, नंदकुमार डाकोरे, सोमनाथ सोलव, व्यकंटराव देसाई, प्रभारी सुभाष देसाई युवक तालुकाध्यक्ष मारोती आण्णा मोहीते, रासप युवक अध्यक्ष सुदाम वाघमारे, रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेनगडे, बापुराव डुकरे सरपंच नवनाथ भुसारे, गजानन चापके, रत्नाकर सुर्यवंशी, कैलास हुलसुरे, मारोती मोहिते, शिवाजी आवरगंड, शेख मुस्सा, हबीब पठाण, शेख ईस्माईल, कैलास शिंदे, दिनेश दुधाटे, दत्तराव पौळ, नारायण मोरे,भगवान काळे, विकास घाटे, शेख सरान, विश्वनाथ होळकर, उत्तमराव ढोणे, निव्रती दुधाटे, शाम सोनटके, गितारामजी देसाई, बाबुराव जाधव, शरद जोगदंड, दशरथ मोरे, पुष्पकराज टेलर यांच्यासह आ.डॉ.रत्नाकर गुट्टे (काका) मित्रमंडळ व राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर पायाची भिंगरी आणि तोंडाची आकाशवाणी करु
कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारे आ.डॉ.गुट्टे साहेब म्हणजे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या सारखा निर्मळ मनाचा राजकारणी जिल्ह्यात शोधून सापडणार नाही. म्हणूनच त्यांनी पक्ष व राजकीय चौकटीच्या बाहेर जाऊन मैत्री जोपासली आहे. अगदी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सुध्दा त्यांच्या प्रेमात आहेत. त्यामुळे आमचेही साहेबांवर प्रेम जडले असल्याने आज मित्रमंडळात जाहीर प्रवेश करीत आहे. भविष्यात साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल. म्हणूनच साहेबांचे कार्य व मित्रमंडळाचे धोरण सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविण्यासाठी पायाची भिंगरी आणि तोंडाची आकाशवाणी करु, असे मत सुप्रसिध्द वक्ते संदीप माटेगावकर यांनी मांडले.