*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : अशोका विजयादशमी या दिवशी बुद्ध विहार भालवडी, ता. माण, जि. सातारा येथे “धम्मचक्रप्रवर्तन दिन” मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला यावेळी तालुक्यातून शेकडो धम्म बांधवांची उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करणेत आली भा. बौध्द महासभेचे माण तालुका अध्यक्ष अरविंद बनसोडे व इम्तियाज नंदाफ यांच्या हस्ते प्रतिमाना पुष्पहार अर्पण करणेत आले बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी त्रिशरण पंचशील देणेत आले.
यावेळी इम्तियाज नदाफ यांनी धम्म बांधवाना “धम्मचक्रप्रवर्तन दिना”चे महत्व सांगताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारण्याची कारणे ३१ मे १९३६ रोजी नायगाव, मुंबई येथील ‘अखिल मुंबई इलाखा महार परिषदे’च्या भाषणात आणि ‘मुक्ति कोण पथे?’ या ग्रंथात स्पष्ट केलेली आहेत. त्यात बाबासाहेब म्हणतात, बौद्ध धम्म स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूलभूत सिद्धांतांची शिक्षा देतो. बौद्ध धम्मच माणसामाणसातील भेद, शोषण आणि विषमता थांबवू शकतो. बुद्धिप्रामाण्यवादी आणि समतावादी तत्त्वज्ञान असलेल्या बौद्ध धम्माचा पाया नैतिक आचरणावर आहे. बुद्धाची शिकवण लोकशाहीवादी असून बौद्ध धम्म दु:खमुक्तीचा मार्ग आहे. बुद्ध म्हणतात, ‘मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे’. भारतातील हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली विषमतावादी समाजरचना म्हणजे एका समाजाला गुलाम बनवून त्याच्यावर अत्याचार करायला सांगते. डॉ. आंबेडकरांना ही समाज रचना बदलून बुद्धाच्या तत्त्वज्ञानानुसार सामाजिक पुनर्रचना करून नवसमाज निर्माण करावयाचा होता. म्हणूनच त्यांनी आपल्या पाच लाख अनुयायांसोबत नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ या विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.
माजी सभापती बाळासाहेब रणपिसे म्हणाले धम्मक्रांतीमुळे धर्मांतरीत बौद्धांच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडून आले आहे. धर्मांतरीत बौद्ध समाजाची मागील ६३ वर्षांतील प्रगती कोणाच्याही नजरेस भरण्यासारखी आहे. ‘धर्म ही कपडे बदलण्याएवढी सोपी बाब नाही, तर ही मानसिकता बदल करण्याची प्रक्रिया आहे. म्हणून धर्मांतराकडे चळवळ म्हणून पाहिले पाहिजे.’ धर्मांतरामुळे झालेले परिवर्तन एकांगी स्वरूपाचे नाही तर ते सामाजिक, धार्मिक, मानसिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी सर्वच क्षेत्रात आढळून येते. एवढेच नव्हे, तर धर्मांतरीत बौद्ध हे विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठतेने आणि तार्किकपणे विचार करतात, हे मानसिक परिवर्तन विलक्षण स्वरूपाचे आहे.हजारो वर्षांच्या अन्याय-अत्याचाराचा बदला घेण्याचा दृष्ट हेतूने डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. धम्माच्या माध्यमातून देशातील जनतेत बंधुता, मैत्री भावना रुजविण्याचाच त्यांचा विशाल दृष्टिकोन होता. भारत देश आणि भारतीय संस्कृतीच्या प्रेमापोटी त्यांनी भारतीय संस्कृती संवर्धित असलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून आपले राष्ट्रप्रेम सिद्ध केले. डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतराला राष्ट्रहिताचीच किनार लाभलेली आहे, हे स्पष्ट होते. धम्मदीक्षा देताना बाबासाहेब म्हणतात, मी भारतातील मूळ संस्कृतीशी अस्पृश्यांची नाळ जोडली असून जगातील बौद्धांशी बंधुत्वाचे नाते जोडून दिले आहे. अलीकडे भारतातील जनतेच्या मनात एकमेकांविषयी द्वेष भावना वाढत आहे आणि त्यामुळेच देशाला बुद्धाच्या प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री भावनेची आवश्यकता आहे. याचा विचार प्रत्येक भारतीयांनी करणे गरजेचे वाटते.
ऍड बाळासाहेब सावंत, संजय खरात सर, बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनीही धम्मचक्रप्रवर्तन दिनाचे महत्व आपल्या मनोगततून व्यक्त केले.