रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 88886 28986
ब्रम्हपुरी:- राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष समाजसेवेचा अनुभव मिळत असतो, जो त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. हे अनुभव भविष्यात त्यांना जबाबदार नागरिक बनवण्यास मदत करतात. “राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, नेतृत्वगुण आणि सामूहिक सहकार्याची भावना विकसित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते,” असे प्रतिपादन युवा वक्ते प्रा. सुरज तलमले यांनी केले. ते गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन कार्यक्रमात बोलत होते.
गंगाबाई तलमले महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य पुरुषोत्तम भर्रे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रम्हपुरी येथिल युवा वक्ते प्रा. सुरज तलमले उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. श्रीकांत कडस्कर, रासेयो कार्यक्रम अधिकारी संतोष पिलारे, प्रा. डिंपल तलमले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वनाने झाली. विद्यार्थ्यांनी एनएसएस गीत सादर केले. एनएसएस अधिकारी प्रा. संतोष पिलारे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्देशांवर प्रकाश टाकला. एनएसएस ही विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा, नेतृत्वगुण आणि शिस्तीचा विकास करण्याचे एक उत्तम साधन आहे. असे सांगितले. प्रा. श्रीकांत कडस्कर यांनी एनएसएस विद्यार्थ्यांना समाजाशी जोडणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. असे सांगितले. प्राचार्य पुरुषोत्तम भर्रे यांनी कार्यक्रमाच्या समारोपात एनएसएसच्या कार्याचे कौतुक करत, समाजसेवा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी भविष्यातही एनएसएसच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेंडे, रितू मांढरे यांनी केले तर आभार आचल शेलोटे ह्या विद्यार्थिनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.